लग्नाची गोष्ट : मिलिंद व मनीषा जोशी

लग्नाची गोष्ट : मिलिंद व मनीषा जोशी
लग्नाची गोष्ट : मिलिंद व मनीषा जोशीsakal

संगीत दोन व्यक्तींना जवळ आणतं, असं म्हणतात. आज संगीत क्षेत्रात आपल्या आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अनेक रिअल लाइफ जोड्या आहेत. अशीच एक जोडी म्हणजे गीतकार, संगीतकार, गायक मिलिंद जोशी आणि गायिका मनीषा जोशी. मिलिंद आणि मनीषा हे दोघंही मुंबईबाहेरून करिअर करण्यासाठी ३-४ वर्षांच्या अंतरानं मुंबईत आले. एका कॉमन मित्रामुळं त्यांची ओळख झाली. मिलिंदनं नुकतीच जाहिरात क्षेत्रातून बाहेर पडून पूर्ण वेळ संगीत क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी ते ‘कवितेचं गाणं’ नावाचा कार्यक्रम करत असत. त्यानंतर मिलिंद यांच्या कार्यक्रमांत, रेकॉर्डिंग्समध्ये मनीषा गायला लागल्या. यादरम्यान त्यांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच त्यांच्या लग्नाला २५ वर्षं पूर्ण होतील.

मिलिंद यांनी सांगितलं, ‘‘स्वतःत नसलेल्या गुणांना भरून काढणारी व्यक्ती आपली सहचारिणी असणं कायमच चांगलं असतं. त्याचप्रमाणं आपल्यातल्या काही गोष्टी आपल्या जोडीदारात असल्या, की आपण आणखीन सहजतेनं एकत्र येऊ शकतो. गाणं हा माझ्या आणि मनीषातील समान धागा आहे. आम्हा दोघांनाही शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं, आम्ही गेली अनेक वर्षं ते शिकत आलो आहोत. तसंच चित्रकलेची माझ्यासारखीच तिलाही आवड आहे. माझा पिंड सुरुवातीपासूनच कलाकाराचा आहे. पर्सनल मॅनेजमेंट ही गोष्ट माझ्याकडं अजिबातच नव्हती. तिला नीटनेटकेपणा प्रिय आहे; तो मी मनीषाकडून शिकलो. ती खूप स्पष्टवक्ती आहे. माझ्या लेखनाची, मी तयार केलेल्या चालीची पहिली श्रोता ती असते. त्यावर ती खऱ्या आणि प्रामाणिक प्रतिक्रिया देत आली आहे. मला त्याचा फायदा होतो. ती खूप प्रामाणिक आहे. आपल्या फायद्या तोट्याचा विचार न करता चांगल्या मनानं ती तिचं म्हणणं मांडते. आम्ही लग्नापूर्वी जितके चांगले मित्र मैत्रिणी होतो, तितकेच चांगले मित्र मैत्रिणी बनून आम्ही लग्नानंतरही राहू शकलो यामागचं कारण तिचा हा स्वभाव आहे.’’

मनीषा मिलिंद यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, ‘‘मिलिंद नेहमी हसतमुख आणि सकारात्मक असतो. कोणत्याही गोष्टीला तो हसत सामोरा जातो. मिलिंदचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे. त्याच्या अवतीभवती भरपूर माणसं असतात. तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही व्यक्तीशी विविध विषयांवर अगदी मनमोकळा संवाद साधू शकतो. त्यामानानं मी गंभीर स्वभावाची होते, पण इतकी वर्षं मिलिंदच्या सहवासात राहून मलाही आता समोरच्या व्यक्तीशी जास्त चांगला संवाद साधता येऊ लागला आहे.

मिलिंद हा जितका चांगला गीतकार, संगीतकार आणि गायक आहे तितकाच तो उत्कृष्ट चित्रकारही आहे. इतर कामांमधून आवर्जून वेळ काढून तो पेंटिंग करत असतो. त्याला वेगवेगळे रंग आवडतात आणि प्रत्येक रंगला तो छान कॅरी करू शकतो. त्यानं आतापर्यंत अनेक सुंदर कविता, गाणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहेत. पण आमच्या एका अल्बममधलं शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ हे मिलिंदने संगीतबद्ध केलेलं आणि मी गायलेलं गाणं माझ्या विशेष आवडीचं आहे. तसंच लवकरच ‘बाहुबली’ हा जगप्रसिद्ध चित्रपट मराठीतून आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटामधील काही गाणीही मिलिंद यांनी लिहिली आहेत. या चित्रपटासाठीही हे दोघं उत्सुक आहेत.

(शब्दांकन : राजसी वैद्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com