मुंबई - सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्या वेबसीरिज रिलिज झाल्या आहेत त्यावरुन वाद रंगत असल्याचे दिसून आले आहे. बिहारमधील निवडणूकांच्या निमित्ताने त्यांना एका राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश झा यांच्या आश्रम मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागणार आहे. त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या मिर्झापूरच्या 2 भागावरुन चर्चेला तोंड फुटले आहे.
साधारण आठवडाभरापूर्वी मिर्झापूर वेबसीरिचा दुसरा भाग रिलीज झाला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी जागरणं करुन ती मालिका पाहिली. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. हे सगळे होत असताना खासदार अनुप्रिया पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मालिकेबद्दल व्टिट करुन तक्रार केली. त्यात त्यांनी मिर्झापूरमध्ये दाखविण्यात आलेल्या हिंसाचारामुळे प्रत्यक्षात मिर्झापूरची बदनामी झाल्याचे म्हटले आहे. ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली मिर्झापूरचा विकास होत आहे. याप्रकारच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन अनेक नकारात्मक बाबींना मालिकेत स्थान देण्यात आले आहे. मिर्झापूर नावाच्या वेब सीरिजमध्ये या जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. या सीरिजच्या माध्यमातून जातीय तेढ पसरवली जातेय’, असा आरोप करत त्यांनी त्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.
खासदारांनी केलेल्या मागणीवर या मालिकेतील मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी यांनी संयतपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या मालिकेत साकारलेली कालीन भैय़्याची भूमिका कमालीची लोकप्रिय झाली आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्रिपाठी म्हणाले, आपण सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. “मिर्झापूरच्या कथेतील प्रत्येक गोष्ट ही काल्पनिक आहे. त्याचा इतर कोणत्याही व्यक्तीशी किंवा जागेशी काहीच संबंध नाही, असे आपण मालिका सुरु होण्यापूर्वी प्रेक्षकांना सांगतो.
आपण एक अभिनेता असून याव्यतिरिक्त अजून काही बोलू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे मिर्झापूर सीरिजमध्ये जर गुन्हेगार आणि गुंड आहेत तर त्यात रमाकांत पंडितसारखा हिरोसुद्धा आहे, जो शहरासाठी चांगलं काम करतोय.” हे लक्षात घ्यावे. असे उत्तर त्रिपाठी यांनी खासदारांना दिलं आहे. ‘मिर्झापूर २’ ही वेब सीरिज २३ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.