
Salim Khan : 'स्टार झाल्यानंतर अमिताभ यांनी कधीही...' सलमानच्या वडिलांना अजुनही वाईट वाटतं!
Salim Khan : बॉलीवू़डमध्ये आपल्या वेगळेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान यांची गोष्ट जाणून घ्यायला चाहत्यांना आवडते. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे वडील एवढीच त्यांची काही ओळख नाही तर त्याशिवाय आपल्या लेखणीनं बॉलीवूडमध्ये अनेकांना स्टारपद मिळवून देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होतो.
सलीम खान यांची एक मुलाखत सध्या भलतीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या लाडक्या लेकाच्या अरबाज खानच्या एका कार्यक्रमामध्ये सलीम खान सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमाची सुरुवातच सलीम खान यांच्या मुलाखतीनं झाली. त्यामध्ये त्यांनी आपल्या करिअरमधील वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा केला होता. यात सलीम खान यांनी वैयक्तिक आयुष्याविषयी देखील प्रतिक्रिया दिली होती.
Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
आता सलीम यांनी त्यांचे आणि अमिताभ यांचे नाते कसे आहे यावर भाष्य केले आहे. अमिताभ आणि सलीम खान यांचे नाते अनेकांना माहिती आहे. अमिताभ यांना स्टार बनवण्यात सलीम खान यांच्या लेखणीचा मोठा वाटा आहे. त्यामध्ये शोले, दीवार, जंजीर, डॉन यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी केले होते. त्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसादही कमालीचा होता. त्यामुळेच की काय आज अमिताभ यांची लोकप्रियता कायम आहे. असे म्हटले जाते.
त्या मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी अमिताभ यांच्याविषयीच्या काही गोष्टींचा खुलासा केला. १९७३ मध्ये आलेल्या जंजीर नावाच्या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन नावाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटली होती. त्यामागे सलीम खान होते. त्यांनी त्या चित्रपटाचे लेखन केले होते. सलीम खान यांनी या मुलाखतीमध्ये त्यांचे आणि बिग बी यांचे नाते कसे होते यावर भाष्य केले आहे.
सलीम खान म्हणाले, अमिताभ यांचा स्वभाव एकांतप्रिय आहे. ते जास्त बोलत नाहीत. जंजीरच्या वेळची गोष्ट आहे. ती स्क्रिप्ट देवानंद, दिलीप कुमार, धर्मेंद्र यांनी दुसरीकडे पास केली होती. त्यामुळे ती अमिताभ यांच्याकडे आली. मला अमिताभ यांच्या अॅक्टिंगवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी जे काही लिहिले ते त्यांना समोर ठेवूनच. त्याचे चीजही झाले. याचा आनंद आहे. मला वाटतं की, माणूस मोठा अभिनेता झाला की त्याच्याबरोबर अनेक जबाबदाऱ्या वाढतात.
अमिताभ यांनी स्टार झाल्यानंतर फारसा कधी संवाद साधला नाही. भलेही ते एकांतप्रिय होते. पण आपण आपल्या जुन्या व्यक्तींशी सातत्यानं संबंध ठेवायला हवा.त्यासाठी जे हवे असते ते अमिताभ यांच्याकडून कधी आले नाही. मी असे म्हणणार नाही की, अमिताभ आणि मी फार जवळचे मित्र होतो. पण केवळ माझ्यासोबतच नाहीतर अनेकांबरोबर त्यांचे वागणे हे वेगळे होते. यामुळे कालांतरानं आमच्या नात्यात दरी पडली. असेही सलीम खान यांनी यावेळी सांगितले.