गावी जाणाऱ्या कामगारांचे वाहन उलटले, १९ जण जखमी

19 Workers Injured in Accident
19 Workers Injured in Accident

वाळूज (जि. औरंगाबाद) - एका वाहनाने हूल दिल्याने पीकअप वाहन उलटून १९ कामगार जखमी झाले. ही घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ मंगळवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. यात पीकअपमधील १९ कामगार जखमी झाले. हे कामगार मुंबईकडून जालन्याकडे जात होते. 

लॉकडाउनमुळे मुंबईत अडकलेले जालना जिल्‍ह्यातील काही कामगार कुटुंबीयांसह सोमवारी (ता. १८) रात्री बाराच्या पीकअप जीपमध्ये (एमएच ४७ ई ०७७९) बसून जालन्याला जात होते. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ एका वाहनाने त्यांच्या वाहनाला हूल दिली. त्यामुळे जीपचालक अंबादास वाहुळे (रा. जालना) याचा ताबा सुटला आणि जीप रस्त्यावरच उलटली.

या अपघातात जीपमधील संजय खरात, बबन खरात, भारती खरात, नेहा वाघमारे, गोदाबाई लांडगे, आकाश खरात, स्वाती खरात, सिद्धोदन लहाने, विजय लहाने, अजय लहाने, राजा लहाने, तुकाराम सोनवणे, औण सोनवणे, आयुष खरात आणि सुनीता खरात जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या कामगारांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल केले. यासाठी डॉ. सुमेध जाधव, चालक राजू रोडके यांनीही मदत केली. 

पंधरा हजार परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना 

औरंगाबाद : लॉकडाऊनमूळे जिल्ह्यात अडकलेल्या अनेक परराज्यातील मजूरांना आपल्या स्वगृही जाण्यासाठी शासनाने परवानगी देत वाहतुकीची व्यवस्था केली. जिल्ह्यातून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार राज्यातील मजूरांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर १५ हजार परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना झाले आहेत. येत्या २२ मे रोजी औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून बिहारच्या अॅरीयासाठी तर २३ मे रोजी मुझ्जफरपूरसाठी रेल्वे रवाना होईल. सर्वसाधारणपणे साडेतीन हजार मजूर रेल्वेद्वारे प्रवास करतील. 

सात मे रोजी भोपाळसाठी पहिल्या रेल्वेने सुरवात झाली. त्यानंतर आठ मे जबलपूर तर नऊ मे रोजी खांडवा, मध्यप्रदेशसाठीच्या रेल्वे रवाना झाल्या. मध्य प्रदेश शासनाने मध्यप्रदेश मजुरांच्या प्रवासाचा खर्च भरलेला आहे. सर्वसाधारणपणे मध्यप्रदेश मध्ये साडेतीन हजार मजुरांना रेल्वेद्वारे पोचवण्यात आलेले आहे. औरंगाबादहून उत्तर प्रदेशमधील आठ हजार मजुरांना आपल्या स्वगृही पोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करून या मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी मदत केली आहे.

त्यांतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून तेरा मे रोजी औरंगाबाद ते बालिया आणि औरंगाबाद ते गोरखपूर या दोन रेल्वे पाठविण्यात आल्या. १४ मे रोजी औरंगाबाद ते उन्नाव आणि औरंगाबाद ते आग्रा या दोन ठिकाणांसाठी तर सोळा मे रोजी औरंगाबाद ते लखनौ या रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.झारखंडसाठी १९ मे रोजी औरंगाबाद ते डालटन गंज या ठिकाणासाठी रेल्वे सोडण्यात आली. औरंगाबादहून जाणाऱ्या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे. तसेच सर्व मजुरांना मास्क व अन्नाची पाकिटे व पाण्याची बाटली रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी दिली. आतापर्यंत १७१ बसेसद्वारे ३,५०० मजूर लोकांना त्याच्या राज्या लगतच्या महाराष्ट्रच्या सीमेवर रवाना केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com