औरंगाबाद : संपूर्ण जग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मदतीसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे येत आहेत. असे असताना दुसरीकडे काही लुटारू दुकानदार लॉकडाऊनचा उपयोग ग्राहकांना लुटण्यासाठी करीत आहेत. शहरातील अनेक भागात कलम १४४ पायदळी तुडवले जात असताना प्रशासनाने मूग गिळलेत काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. लोकांनी मात्र त्याचा इव्हेंट केला. त्यानंतर देशभरात संचारबंदी लागू केली. तत्पूर्वीच जमावबंदी कलम १४४ लागू केले; मात्र लोकांनी त्याचा फज्जा उडवला. लोक रस्त्यावर खुलेआम फिरत असताना प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवले जात आहेत.
हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..
सोमवारी (ता.२३) रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना रात्री १२ वाजेपासून लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांचे भाषण संपण्याआधीच लोकांनी दुकानांवर खरेदीसाठी तोबा गर्दी केली. चार तासांत लोकांना दुकानदारांनी लुटले. त्यानंतरही हा प्रकार सर्रास सुरूच आहे. आता साखर, तेलाच्या दरात नेहमीपेक्षा २० ते ३० रुपयांनी वाढ केलेली आहे.
सोशल डिस्टन्सिंग नावालाच
दुकानांवर खरेदीसाठी केलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. अशा सूचना कम आदेश आहेत. मात्र, दुकानांवर, भाजीपाला खरेदी करताना होणारी गर्दी पाहता, त्याचे पालन का होत नाही? याची पाहणी होते का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
साडेपाच लाख लोकांना देणार धान्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विना बायोमेट्रिक शिधावाटप करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकत्रच देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रत्येक महिन्याला ते देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने असून, सात लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे.
हेही वाचा : कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..
यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्नयोजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण पाच लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांना एकत्र धान्यवाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्यांची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२, प्राधान्य कुटुंबातील चार लाख आठ हजार ४० असे एकूण पाच लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांना लवकरच धान्य वाटप करण्यात येणार आहे.
सदस्याला दर महिन्याला पाच किलो धान्य मोफत
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पात्र लाभार्थ्यांना प्रतिसदस्य एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात यावे, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देण्यात आले आहेत. यासाठी तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुकानदार म्हणतात...
आम्हाला होलसेलमध्ये पुरेसा व योग्य दरात किराणा साहित्याचा पुरवठा झाला तर आम्हीही नेहमीच्या दरात ग्राहकांना विकू. त्यासाठी प्रशासनाने काही व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर आळा घातला पाहिजे. सध्याची अडचणीची स्थिती आम्हालाही कळते. परंतु, काही व्यापारीच साठा करून दर वाढवित आहेत. त्यामुळे त्यांचा आधी बंदोबस्त करा, अशी मागणी शहरातील किराणा दुकानदार करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.