औरंगाबाद : मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांवर अस्मानी संकट नवे राहिले नाही. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाला सामोरे जावे लागते. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानापोटी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून जाहीर केल्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे. दरम्यान, मराठवाड्यात आता केंद्रीय पथकाचा दौरा ठरला आहे. येत्या रविवारपासून (ता.२०) दोन दिवस पथक मराठवाड्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तालयाला कळवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यंदाच्या मॉन्सूनमध्ये पाऊस मनसोक्त बरसला, मात्र शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला. नुकसानीच्या पंचनाम्यांच्या अहवालानुसार ३५ लाख ६९ हजार ४०० शेतकऱ्यांच्या २४ लाख ९५ हजार ९०१ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये २५ लाख ७ हजार १०८ हेक्टर कोरडवाहू तर ३९ हजार ५६० हेक्टर अशा २५ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणनेुसार पहिल्या टप्प्यातील १३३६ कोटी ८९ लाख रुपये अनुदानाचे वाटपही जवळपास पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार पहिल्या टप्प्यातील तब्बल २१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान वाटप करण्यात आले आहे. आता अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान केंद्रीय पथकाचा दौरा निश्चित झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत गावनिहाय नियोजन ठरण्याची शक्यता आहे.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.