कोरोनारूपी राक्षस बसलाय दबा धरून : काही नाही होत म्हणणाऱ्यांनो... 

Aurangabad News
Aurangabad News

कोरोना या वैश्विक महामारीला कायमचे हद्दपार करण्यासाठीच केंद्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुरू केलेल्या लॉकडाऊनला पायदळी तुडवत मर्दुमकी गाजवणाऱ्या औरंगाबादवासीयांनो, आता तरी डोळे उघडा... नाहीतर कायमचेच डोळे मिटायची वेळ येऊ शकते! जगभरातील पाऊण लाख नागरिकांना गिळंकृत केलेल्या या कोरोनारूपी महाराक्षसाचा वध करायचा असेल तर प्रत्येकाने घरातच राहण्याची ही खरी वेळ आहे.

कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीय, मित्र आणि पर्यायाने समस्त देशवासीयांना या कोरोनारूपी महाराक्षसापासून वाचविण्यासाठी तुमचा एक प्रयत्नदेखील देशहिताचाच ठरणार आहे. पोलिसी खाक्या दाखवल्यावरच जर तुमचे डोके ठिकाणावर येणार असेल तर मात्र दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही. पोलिस यंत्रणेनेही आता दयामाया न दाखवता बिनकामाचे बाहेर हुंदडायला निघालेल्यांना चोप देण्यास हरकत नाही.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या आज रोजी १४ वर येऊन ठेपली आहे. याला केवळ आपणच जबाबदार असून असाच निष्काळजीपणा आपण करत राहिलो तर ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाईल आणि विदेशात सुरू असलेले मृत्यूचे तांडव आपल्या देशातही सुरू व्हायला वेळ लागणार नाही. शासनाने लॉकडाऊन कालावधी वाढवू नये, कालावधी वाढवल्यास अथवा सद्यःस्थिती हाताळण्यासाठी नाइलाजाने लष्कराला अथवा एसआरपीला पाचारण करू नये, असे वाटत असेल तर सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याबरोबरच कारण नसताना घराबाहेर पडणे टाळलेच पाहिजे. 

मुबलक प्रमाणात जीवनावश्यक वस्तू, मेडिसीन; तरीही गर्दी! 

लॉकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र तसेच राज्य शासनातर्फे काळजी घेतली जात आहे. मुबलक प्रमाणात जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला, औषधी वगैरे सोयीसुविधा उपलब्ध असूनही बहुसंख्य नागरिक किराणा, भाजीपाला खरेदीसाठी झुंडीने बाहेर पडत असल्याचे विदारक चित्र शहरातील विविध भागांत पाहायला मिळते आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हे जर थांबले नाही तर येणाऱ्या काळात आणखीनच भयानक परिस्थिती उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अनेक भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्या त्या भागातील नागरिकही आता पूर्वीपेक्षा जागरूक झाले असून आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती, बाहेरगावाहून आलेले नागरिक अथवा फेरीवाल्यांना आपापल्या वसाहतीत येणाऱ्यांना मज्जाव करत आहेत ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. 

लक्ष्मणरेषा ओलांडली की, घात झालाच म्हणून समजा! 

वैद्यकीय उपचार, अत्यावश्यक काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका. घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून मीदेखील एक सच्चा देशभक्त असल्याचे दाखवून देण्याची हीच ती योग्य वेळ आहे, हे विसरू नका. कोरोनारूपी महामारीला आत्ताच आटोक्यात नाही आणले तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे औरंगाबादवासीयांनो, आता तरी मनावर घ्या... नाहीतर या महाराक्षसापासून आपणाला कुणीही वाचवू शकणार नाही.

लाथों के भूत, बातोंसे नही मानते...!

विनाकारण बाहेर हुंदडण्यासाठी निघणाऱ्यांना आता पोलिसांनीच चांगला चोप दिला तरच कोरोना महामारीला आळा बसू शकतो; अन्यथा शासनाने कितीही उपाययोजना केल्या तरीही त्या फेल ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘लाथों के भूत, बातोंसे नही मानते’ असे म्हणतात ना. त्यामुळे आपल्यासोबतच अनेकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना पोलिसी खाक्या काय असतो, हे दाखविणेच योग्य ठरणार आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com