राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patil

औरंगाबाद : मागच्या वेळी चांगली लढत देणारे शिरीष बोराळकर यांनाच मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यावेळी पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच. उमेदवारीवरून कोणाची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढली जाईल असे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर निवडणूक व संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने रविवारपासून (ता.आठ) दोन दिवसांच्या दौऱ्यावर श्री.पाटील आले होते. रविवारच्या आढावा बैठकीनंतर सोमवारी (ता.नऊ) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, प्रितम मुंडे, आमदार अतुल सावे, संभाजीराव पाटील निलंगेकर, हरिभाऊ बागडे, पदवीधरचे उमेदवार शिरीष बोराळकर, संजय केनेकर उपस्थित होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी मिळाली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. भाजपतर्फे दुसऱ्यांदा श्री. बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे. याच निवडणुकीत प्रवीण घुगे, किशोर शितोळे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. प्रवीण घुगे यांच्या नावाच्या तर मतदारांपर्यंत पोलचिटही पोचल्या आहेत.

मात्र श्री.बोराळकर यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर सोशल मीडियावर बहुजनांवर अन्याय होत असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर विचारले असता भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.पाटील म्हणाले, कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढू. रमेश पोकळेना उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत का असे विचारले असता ते म्हणाले, किशोर शितोळे देखील इच्छुक होते. ते माझे खास असताना त्यांनाही मी उमेदवारी देऊ शकलो नाही. सामुहिक निर्णय करताना हे होणारच यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत.

साखर कारखान्याच्या कामामुळे त्या येऊ शकल्या नाहीत असे श्री.पाटील यांनी खुलासा केला. राज्य सरकारवर टीका करताना श्री.पाटील म्हणाले, कोरोनाकाळात लोक आर्थिक बाबींनी त्रस्त आहेत. नाभिक समाजात २८ वर आत्महत्या झाल्या आहेत. हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत, अशा लोकांसाठी सरकारने कोणतेही पॅकेज न दिल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या लोकांना पॅकेज दिले पाहिजे. शेतकऱ्यांनी हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था झाली आहे. सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर कर्ज काढावे असा सल्ला देऊन शेतकरी आणि बारा बलुतेदारांच्या प्रश्‍नावर हिवाळी अधिवेशन काळात भाजप रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका
मराठा आरक्षणप्रकरणी आम्हाला कोणाचा राजीनामा मागायचा नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. स्टेपुर्वी अनेक नोकऱ्या फायनल झाल्या होत्या. फक्त नेमणुका द्यायचे बाकी होते. प्रवेश फायनल स्टेजला होते. या वर्षापुरता तरी स्टे देऊ नका अशी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला विनंती करायला पाहिजे होती. आता एमबीबीएसची हळूच प्रवेश प्रक्रिया सुरू करून सरकारने तुमचे काही होणार नाही असेच मराठा समाजाला संकेत दिले असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com