‘ब्रह्मगव्हाण’चे पाणी शेवटच्या गावास मिळेल तो क्षण आनंदाचा असेन, रोहयो मंत्री भुमरेंचा पण

Sandipan Bhumare
Sandipan Bhumare

पाचोड (जि.औरंगाबाद) : जेव्हा जायकवाडी धरणातून कार्यान्वित केलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या गावांस मिळेल तो क्षण मंत्रीपद मिळण्यापेक्षाही माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असेन, असा पण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केला. थेरगाव व वडजी (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१८) आयोजित नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते.


श्री.भुमरे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मी पाच वेळा आमदार म्हणून निवडून येऊनही मी पक्षाकडे काहीही मागितले नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहून सतत जनतेचं काम करत आलो. त्याच एकनिष्ठतेच फळ मला आज पक्षानं दिलं आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला असामान्य पद दिलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी व जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी कदापि तडा जाऊ देणार नाही. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम मी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचे १८ बाय १८चे अंतराची अट रद्द केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना पूर्णत्वासाठी लक्ष देऊन खेर्डा प्रकल्पात पाणी आणले. आता खेर्ड्यापासून पुढील गावांस पाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे.

जेव्हा या योजनेचे पाणी शेवटच्या गावांस मिळेल तो क्षण मंत्रिपदापेक्षाही जीवनातील आनंदाचा मोठा क्षण असेन. राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत, वस्त्यापर्यंतचे रस्ते मनरेगाअंतर्गत करून घ्यावीत. पूर्वीचे केवळ भराव टाकण्याचे काम बंद करुन आता मजबुत रस्ते देण्यात येतील. याकरीता त्या-त्या गावांतील ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करावेत. पैठण तालुक्यातील मोसंबीचे क्षेत्र लक्षात घेऊन पाचोड येथे वीस कोटी रुपये खर्चाचे दोन एकर क्षेत्रावर शितगृह (कोल्ड स्टोरेज) उभारण्यास मंजुरी मिळाली असुन लवकरच हे काम सुरू करण्यात येईल.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार आहे. यापूर्वीच्या फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून कर्जमाफी देताना सहासष्ट अटी घातल्या, परंतू आम्ही सर्व अटी काढुन केवळ अंगठा देण्याची अट ठेवली. आता कोरोनाची परिस्थीती नियंत्रणात येताच सर्वाना त्याचा लाभ मिळेल. मंत्रिपद मिळाल्यानंतर वडजी, थेरगाव व टाकळी अंबड येथे भुमरे यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत गावांतून भुमरे यांची भव्य फेरी काढण्यात आली. यावेळी माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे,अरुण काळे,कमलाकर एडके, विलास गोलांडे, कृष्णा भुमरे, अंबादास नरवडे,बद्री निर्मळ,सोमनाथ निर्मळ, प्रकाश निर्मळ, हरी निर्मळ, रामकिसन निर्मळ कल्याण निर्मळ, भाऊसाहेब गोजरे,आबा गोजरे, डॉ बाबासाहेब गोजरे, कैलास भांड, प्रशांत भांड यांच्यासह  कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com