औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यू म्हणून पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे. त्याला प्रतिसाद देत औरंगाबादकरांनी प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले आहे.
सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारीच शहर परिसरात फेरी काढत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच थांबा, गर्दी टाळा, असे सांगत जनजागृती केली होती. त्या पार्श्वभूमीवर कालपासूनच बाजारपेठ बंद असल्यामुळे नागरिकांनीही घरातच बसणे पसंत केले आहे.
त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, टिळकपथ, गजानन मंदिर परिसर, टीव्ही सेंटर भागात रविवारी सकाळी शुकशुकाट पाहायला मिळाला. जालना रस्ल्यालाही कधी नव्हे, ते वाहनांची वर्दळ नव्हती.
वाहतूक पोलिस मात्र प्रत्येक चौकात उभे आहेत. अनावश्यक कुणी फिरताना दिसले, तर त्याला समजावून परत पाठवत आहेत. त्याखेरीज चिटपाखरूही नसलेल्या औरंगाबादच्या रस्त्यांवर केवळ शांततेचं साम्राज्य आहे.
तीन दिवस भाजीमंडई बंद
छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी भाजीमंडईतील भाजीपाला आणि फळ मार्केट रविवारपासून (ता. २२) मंगळवारपर्यंत (ता. २४) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळे व भाजीपाला अडत व्यापारी असोसिएशनने शनिवारी (ता. २१) हा निर्णय घेतला आहे.
या बंदच्या दरम्यान सर्व मार्केटमधील साफसफाई करावी आणि महापालिकेच्या मदतीने बाजार समितीचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बंदच्या काळात शेतकऱ्यांतर्फे रोडवर अस्वच्छ ठिकाणी माल टाकून विक्री करण्यात येईल, हे थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
Janata Curfew In Aurangabad To Fight Coronavirus India Maharashtra News
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.