अतिवृष्टीमुळे ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान कुठे वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान कुठे वाचा सविस्तर


औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१६) अधिकाऱ्यांना दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची उपस्थिती होती.

पुढे श्री. देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४० ते ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्वरित पंचनामे सुरू करा. तसेच जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यात मुख्यमंत्र्यांची संकल्पना असलेले ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाचा समावेश करावा. जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल, तालुका पातळीवरील संकुलाची कामे आणि क्रीडा संदर्भातील प्रगतीपथावरील विविध कामे आणि पुढील नियोजनासंबंधीचे प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च २०२१ या कालावधीत होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसंबंधी नियोजनाची माहिती दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्ज योजनेअंतर्गत एक लाख ७८ हजार ६३० लाभार्थ्यांच्या खात्यात ९३६ कोटी ६१ लाख रुपये जमा झाले असल्याची माहिती दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सामाजिक सौहार्द राखण्याच्या अनुषंगाने पुढील एक महिना सामाजिक सलोखा आणि सुरक्षा अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाची रूपरेषेच्या आखणी पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. 

साताऱ्याच्या धर्तीवर पठारांचा विकास

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर जिल्ह्यातील पठारे विकसीत करण्यात येणार असून, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. फुलांच्या विविध जातींचे रोपे विकसित करण्याकरिता त्यांची बिजे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे यावेळी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com