Success Story: पाण्याअभावी ओसाड पडलेल्या जमिनीवर तीन एकरात सिताफळाचे सव्वातीन लाखांचे उत्पन्न

farmer success story
farmer success story

पाचोड (जि.औरंगाबाद) : जिद्द, मेहनत व पराकाष्टा या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. याची प्रचिती पाचोड (ता.पैठण) येथील तरुण शेतकऱ्याने तोट्याच्या समजल्या जाणारी सिताफळाची शेती फुलवून दाखवून दिले. एवढेच नव्हे तर खरिपाने दगा दिल्यानंतर सिताफळाची बाग वरदान ठरली आहे.

आता सर्वत्र शेतीकडे वजाबाकीचा धंदा म्हणून पहिले जात आहे. प्रत्येकजण पाणी, मनुष्यबळ व आर्थिक टंचाईमुळे शेतीकडे पाठ फिरवत आहे. पाचोड येथील अक्षय जयकुमार बाकलीवाल या युवकाची थेरगाव शिवारात वडिलोपार्जित पन्नास एकर शेती असून मोसंबीसह ऊस लागवडीखाली होते. मनुष्यबळ व पाण्याअभावी शेती तोट्याची ठरू लागली. त्यातच पाण्याअभावी शेत शिवार वाळवंट बनून शेती हगामी बागायतीवर आली.

शेतीवर झालेला खर्चही पदरी पडेना, त्यामुळे शेतीकडे स्वतः सहकुटुंबियांनी पाठच फिरविली होती. मात्र शेती सोडून रिकामे राहणे त्यांना अस्वस्थ करू लागल्याने दोन वर्षापूर्वी अक्षय बाकलीवालने कुटुंबियांचे मन परिवर्तन करून नैसर्गिक व कोरडवाहू शेतीकडे सर्वांचे मन वळविले व त्याने पाचोड - पैठण रस्त्यावरील थेरगाव शिवारातील हलक्या व मुरमाड असलेल्या जमिनीवर मनोमनी सिताफळाची बाग फुलविण्याचा दृढ निश्चय केला. तीन एकरावर ८×१० अंतरावर ठिबक बसवून घेतले व त्यावर जून २०१८ मध्ये गोल्डन वाणाच्या सिताफळाची दीड हजार रोपे लावली.

तिसऱ्या वर्षी (यंदा) कष्टाला फळे येऊन उत्पन्न निघण्यास सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी आठ टन माल निघाला. त्यास प्रति किलो चाळीस रुपये प्रमाणे भाव मिळाला. एक ते दीड किलो वजनाच्या जवळपास दर्जेदार फळं लगडली.ही दर्जेदार फळ पाहुन विविध ठिकाणाच्या आईसक्रिम कंपन्यानी खरेदीसाठी मागणी केली. मात्र प्रथमच उत्पन्न घेत असल्याने व बाजारपेठेविषयी अनभिज्ञ असल्याने यंदा ही बाग हैद्राबादच्या व्यापाऱ्यास विकली.त्यांनी जागेवरच फळांची छाटणी करून गुणवत्तेनुसार खोक्यात पॅकींग करुन कंपनीस ९० रुपये किलोप्रमाणे निर्यात केली.

स्वतःसह सालगडी बहर धरण्यासाठी फेब्रुवारीमध्ये झाडांची छाटणी केली. उन्हाळ्यात जेमतेम ठिबकने पाणी सोडले.पाणी देण्याच्या अगोदर साधारणपणे एका झाडाला शेणखत व थोडेफार अन्य अन्नद्रव्ये दिले. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमीन सुपीक झाली. त्यामूळे फळांची प्रतवारी, दर्जा उंचावून रंग चांगला येण्यास मदत झाली. साधारणपणे एप्रिल - मे मध्ये फुलधारणा झाली. जुलैपासून फळधारणा सुरू होऊन ऑक्टोबर - नोव्हेंबरपर्यंत फळांचे उत्पादन मिळाले.

बागेची स्वच्छता आणि झाडांची योग्य निगा राखण्यासाठी बागेत ट्रॅक्टरने पाळ्या दिल्या. कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही वेळा बुरशीजन्य औषधी फवारली. फळे मोठी आणि पक्व झाल्यानंतर प्रथमत: त्याची व्यापाऱ्यास विक्री केली. सिताफळांच्या उत्पादनामुळे अक्षय या युवकाची वेगळी ओळख तयार झाली. अतिवृष्टीमुळे सर्वत्र फळबागा, खरिपाने शेतकऱ्यांना दगा दिला.मात्र कोरडवाहू व नैसर्गिकरित्या फुलविलेल्या सिताफळाच्या बागेने हात दिला. प्रयत्नाला पराकाष्ठेची जोड दिल्यास यश हमखास मिळते हे युवकाच्या प्रेरणेतून पाहवयास मिळाले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com