औरंगाबाद - कचराकोंडीला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून महापालिकेत आशादायी चित्र निर्णय होत आहे.27 मशिन खरेदी, कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या निविदा अंतिम झाल्यानंतर आता महापालिकेने शेतकऱ्यांसाठी चारशे टन खत उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे या खतामध्ये काच, प्लॅस्टिक नसल्याचा दावा करण्यातही करण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचराकोंडीने नागरिक त्रस्त आहेत. सर्वच भागांत रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने कचरा प्रक्रियेसाठी पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा व कांचनवाडी येथे जागा निश्चित केल्या. मात्र येथे देखील नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. वारंवार आंदोलने होत असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने शहरातील डंपिंग स्पॉट संपविले आहेत.
येत्या काही दिवसांत कचरा प्रक्रियेसाठी मशिन उपलब्ध होणार आहेत, असे असले तरी सध्या महापालिकेने कचऱ्यापासून 400 टन खत तयार केले आहे. हे खत आता शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे. हे खत शुद्ध असून, प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. 8) केला. सिद्धार्थ उद्यानात शेतकऱ्यांना खत पाहता येईल. नागरिकांनी कुंड्यांमध्ये वापरण्यासाठी देखील खत घेऊन जावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
|