बिहार राज्यातील ५८ मजुरांचे पलायन

58 labour palayan
58 labour palayan

कळमनुरी (जि. हिंगोली)  : कोरोनाच्या पाश्वभूमीवर तालुक्यात अडकलेल्या बिहार येथील ५८ मजुरांनी यंत्रणेला गुंगारा देत सोमवारी (ता.१८) मध्यरात्रीला पोबारा केला. त्यामुळे त्यांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी मागील आठ दिवसापासून प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. 

तालुक्यातील उमराफाटा येथे सुरू झालेल्या गजानन खासगी कृषी बाजार उद्योग समूहात शेती मालाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी काम करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून बिहार राज्यातील अनेक मजूर कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. 


मजुरांना परत पाठविण्यासाठी प्रयत्न

दर तीन ते चार महिन्याला एकदा गावाकडे जाऊन मजूर येथे काम करीत असत. मात्र मागील दोन महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मजूर येथे अडकून पडले होते. काही दिवसांपासून त्यांनी आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी प्रयत्न चालवले होते. या मजुरांची अडचण लक्षात घेत ग्रामसेवक दत्ता केंद्रे यांनी मजुरांना परत पाठविण्यासाठी प्रयत्न चालवले होते. 

मजुरांची तहसील कार्यालयात नोंद

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाने बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना  आरोग्य तपासणी करून गावी जाण्याची मुभा दिली होती. ग्रामसेवक श्री. केंद्रे यांनी उमरा फाटा येथे अडकलेल्या बिहार राज्यामधीलतील ५८ मजुरांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याकरिता सर्व मजुरांची तहसील कार्यालय येथे नोंद केली होती. 

तीन बस ठेवल्या होत्या सज्ज

तहसील कार्यालयाकडून मजुरांची नोंद झाल्यानंतर या कार्यालयाने मजुरांना छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत देवडी (जि.गोंदिया) पर्यंत सोडण्यासाठी कळमनुरी आगाराशी संपर्क साधण्यात आला. कळमनुरी आगाराकडूनही या मजुरांना गोंदिया जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी तीन बस तयार ठेवल्या. 

मध्यरात्रीच केला पोबारा

मंगळवारी (ता.१९) सकाळी आठ वाजता बस उमरा येथे अडकलेल्या मजुरांना घेऊन गोंदिया जिल्ह्याकडे रवाना होणार होत्या. मात्र उमरा फाटा येथे वास्तव्याला असलेल्या ५८ मजुरांनी सोमवारीच (ता.१८) मध्यरात्री आपले राहते ठिकाण सोडून पोबारा केला. सकाळी मजुरांना घेऊन जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध झाली. 

रेल्वेची ऑनलाइन बुकिंग

मात्र बसमधून जाणारे मजूरच गायब झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. संबंधितांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला. अमरावती येथून थेट गावापर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध असल्याची माहिती मिळालेल्या मजुरांनी रेल्वेची ऑनलाइन बुकिंग करून मध्यरात्रीच अमरावतीकडे प्रयाण केल्याची माहिती समोर आली आहे. मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याकरिता मागील आठ दिवसांपासून प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेला गुंगारा देत मजुरांनी पोबारा केल्यामुळे यंत्रणा मात्र अडचणीत सापडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com