पन्नास लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत शहरातील एका ज्येष्ठ व्यापाऱ्याचे सोमवारी (ता.30) रात्री काहीजणांनी अपहरण केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धडाकेबाज ऑपरेशन राबवीत अवघ्या सहा तासांमध्ये अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (ता. 31) चार संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 शहरातील शिवशक्ती ग्रीन सिटी येथील खेराजभाई भानुशाली (वय 70) हे सोमवारी (ता.30) सायंकाळी जुना मोंढा येथील दुकानातून घरी निघाले होते. घराशेजारी ते आले असता तीन व्यक्‍तींनी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास एका कारमध्ये जबरीने बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर खेराजभाई भानुशाली यांच्या मोबाईलवरून त्यांचा मुलगा दीपक यांना अपहरणकर्त्यांनी दूरध्वनी करून 50 लाखांची खंडणी मागितली.

त्यानंतर दीपक यांनी याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना या प्रकरणात तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अपहरणकर्त्यांची कॉल रेकॉर्डिंग, लोकेशन काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम मागितलेल्या मुर्गी तलाव येथे दीपक भानुशाली यांना एका कारमध्ये पाठविले. या कारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी किरण मोरे यांना शस्त्रांसह पाठविण्यात आले होते; मात्र अपहरणकर्त्यांनी तीन ते चार वेळा ठिकाणात बदल केला; मात्र पोलिसांनी पूर्ण भाग कव्हर करीत दुचाकी, ऑटोरिक्षा अशा वाहनांनी सर्वत्र नजर ठेवून होते. यात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कदीम जालनाचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके, "एडीएस'चे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांचा समावेश होता. 

दरम्यान, रात्री साडेअकरा-पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान सेंट मेरी स्कूलच्या बाजूला असलेल्या एका गल्लीमध्ये अपहरणकर्त्याने दीपक यांना खंडणीचे पन्नास लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. दीपक यांनी येथे जाऊन खंडणीची रक्कम दिल्यानंतर अपहरणकर्त्याने खेराजभाई भानुशाली यांना दीपक यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौर व पथकातील कर्मचाऱ्यांनी अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. यात अपहरणकर्ते खंडणीचे पन्नास लाख, एक गुप्ती सोडून पसार झाले. पोलिसांच्या दक्षतेमुळे खेराजभाई भानुशाली यांची सुखरूप सुटका झाली. दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठी चारजणांना ताब्यात घेतले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

पोलिस निरीक्षक ऑटोरिक्षामधून 
खंडणीचे पन्नास लाख रुपये घेऊन दीपक भानुशाली हे कारने निघाल्यानंतर त्यांच्या कारच्या पाठीमागे काही अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे ऑटोरिक्षाने गेले; तसेच काही कर्मचारी हे दुचाकीवरून आसपासच्या हालचालींवर नजर ठेवून होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com