बीड बायपासवर आयुक्तांसमोरच अपघात 

Accident
Accident

औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर एकीकडे पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करीत असताना एकाच दिशेने येणारे तीन वेगवेगळे दुचाकीस्वार धाडकन कोसळले. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अयप्पा मंदिरालगत घडली. 

सततच्या अपघातांमुळे बायपास रस्त्यावर नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर पाहणीसाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद अयप्पा मंदिर परिसरात होते. त्यावेळी एकाच बाजूने तीन वेगवेगळे दुचाकीस्वार गोदावरी टी पॉइंटकडे जात होते. त्यांचा अपघात होऊन तिघे जमिनीवर कोसळले. यात एक ज्येष्ठ नागरिक, मुलगी व महिलेचा समावेश होता. मागून कोणतेही वाहन न आल्याने तिघे बालंबाल बचावले. या घटनेनंतर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांची मदत केली. 

असे आहे अपघातांचे प्रमाण 
 

  • एका पाहणीत दरदिवशी बायपासवर सरासरी अपघातांचे प्रमाण 
  • 8 ते 10 किरकोळ अपघात. 
  • 2 मोठे अपघात. 
  • 3 ते 4 जण जखमी. 
  • एक प्राणांतिक अपघात, एक ते दोन गंभीर जखमी. 
  • आठवड्यात एक ते दोघांचा बळी. 

या समस्या सोडवण्याची गरज 
 
दळणवळण वाढले - सातारा परिसरातून वाळूज, पैठण, बीड व शहरात जाण्यासाठी एकमात्र बीड बायपास रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक होतेच; परंतु शहरात नो एंट्री असलेली जड वाहतूक आणि खासगी ट्रॅव्हल्सही आता या मार्गावरून वळवण्यात आले. त्यामुळे दळणवळण वाढले. येथील चौकात आवश्‍यकतेनुसार सिग्नल बसवून विद्युत दिव्यांचा प्रश्‍नही सोडवावा लागेल. 
 
वेगावर हवे नियंत्रण- बीड बायपास रस्त्यावर सुसाट वेगाने वाहने धावतात. रस्ता ओलांडायचा असेल तर जीव मुठीत घ्यावा लागतो. अशा स्थितीत पादचाऱ्यांची मोठी अडचण होते. वाढत्या वाहतुकीमुळे रस्ताही ओलांडता येत नाही. वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अनेक नाहक बळी गेले आहेत. आता या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर चाप लावण्याची गरज असून, या रस्त्यावर गतिमर्यादा ठेवणे अत्यावश्‍यक झाले आहे. 
 
पोलिसांमार्फत नियमन हवे - बीड बायपास रस्त्यावर देवळाई ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत मोठी वर्दळ असते. या वाहतुकीवर कुणाचाही अंकुश नाही. सुसाट व बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिसांचा वचक हवाच. तसेच रस्त्यावरील मुख्य चौकात वाहतूक नियमनासाठी पोलिसांची गरज आहे. 
 
आवश्‍यक ठिकाणी हवे गतिरोधक -बीड बायपास रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघातही घडले. सुसाट वाहने, रस्त्यालगत अतिक्रमणे व गतिरोधकांचा अभाव या बाबी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढून आवश्‍यक ठिकाणी सोयीचे गतिरोधक बसविण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com