सात वर्षानंतर निर्भयाला मिळाला न्याय, काय म्हणतात महिला 

File photo
File photo

नांदेड :  दिल्लीमध्ये २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना अखेर शुक्रवारी (ता.२०) पहाटे फाशी देण्यात आली. त्यामुळे सात वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे. परंतु, अशा प्रकरणातील न्यायालयीन निकाल हे जलदगतीने लागावेत, अशी अपेक्षा नांदेड शहरातील विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

नराधमांची धडपड न्यायदेवतेलाही मान्य नव्हती
दिल्लीत मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून गाडीतून फेकून दिले होते. १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या या घटनेमुळे देश हादरून गेला होता. २९ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेतील सहा आरोपींना अटक करून त्यापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती. त्यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीने तिहार तुरुंगात ट्रायलच्या दरम्यान आत्महत्या केली होती. उर्वरीत चार आरोपींना शुक्रवारी पहाटे फासावर लटकावल्याने महिलांसह युवतींनी ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला’ अशा भावना व्यक्त केल्या.

हेही वाचाच - चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढीपाडवा...
 
डॉ पुष्पा गायकवाड : निर्भया प्रकरणातील आरोपींना अखेर फाशी दिल्याने तिला न्याय मिळाला. परंतु, ज्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली होती, तेव्हाच ती दिली असतीतर समाजातील अशा अपप्रवृत्तीच्या घटनांना काहीअंशी प्रमाणात आळा बसला असता. समाजानेही असे कृत्य होणार नाही, यासाठी प्रयत्न करायला हवेत. उशीरा का होईना निर्भयासह तिच्या आईलाही न्याय मिळाला. 
 
भागीरथी बच्चेवार : न्यायालयाने ही प्रक्रिया लवकर करायला हवी होती. या प्रकरणातील तब्बल सात वर्षे जगण्याची संधी दिल्याने कायद्याविषयीचा धाक राहिलेला नाही. निर्भयानंतर कित्येक जणींना अत्याचाराला बळी जावे लागले. त्यामुळे अशा प्रकरणातील निकाल हे जलदगतीने व्हायला पाहिजेत. कारण, अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याने मुलींसह पालकांनीही धास्ती घेतलेली आहे. 

हेही वाचायलाच हवे - नांदेडमधील ‘ही’ सामाजिक संस्था जपतेय मानवी मूल्य, कोणती? ते वाचायलाच पाहिजे
 
सुहासिनी पांडे : आज सकाळी निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्यात आली आणि गेले सात वर्षे न्यायासाठी झगडणारी निर्भयाची आई, आपण सामान्य जनतेने अखेर न्यायदेवतेच्या योग्य निर्णयापुढे मान झुकवली. अशा प्रकारच्या अनिष्ट घटना होउ नयेत यासाठी समाजाला शिक्षित करणे आवश्यक आहे. अशा वाईट घटनेच्या गुन्ह्याची न्यायालयीन कार्यवाही झटपट व्हावी.    
 
शान्ता विष्णुगोपाल काबरा : अखेर निर्भया प्रकरणातील आरोपींना सात वर्षानंतर फासावर लटकावलेच. प्रत्येकवेळी फाशीची तारीख जाहीर व्हायची. पुन्हा ती रद्द व्हायची. काही का असेना आरोपींना एकदाचे फासावर लटकावल्याने आम्हा महिलांना खूप आनंद झाला. कारण, आतातरी भविष्यात असे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला काहीअंशी प्रमाणात आळा बसेल. आणि आम्ही समाजात निर्भयपणे फिरू शकू. 
 
त्रिशला दुधमल : निर्भया प्रकरणामुळे सबंध देश ढवळून निघाला होता. गिर्भयाला न्याय मिळऊन देण्यासाठी एक माता डोळ्यात अश्रृंचा महापूर घेऊन संघर्ष करीत होती.  क्रूरकर्मांनी फाशी टाकण्यासाठी अनेक न्यायालयीन खटपटी केल्या. पण त्या सव्वा सात वर्षानंतर निरर्थक ठरल्या. अखेर आज न्याय मिळाला. वासनांध आणि विकृत मनोवृतीचा आज शेवट झाला. त्यामुळे न्यायव्यवस्थेला सलाम.

हे देखील वाचा - नागरिकांनी काळजी न करता खबरदारी घ्यावी.....कोण म्हणाले ते वाचा
 
सुवर्णा सुदर्शन भोरे : सरतेशेवटी त्या नराधमांना फाशी मिळालीच, ती खूप आधीच मिळायला हवी होती. आज मलापण निर्भयाच्या आई एवढाच आनंद होत आहे. न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे ह्याचा आभास झाला. मात्र, कायदे अजून कडक करावेत म्हणजे असे दुष्कर्म होणार नाहीत. अशा प्रकरणातील खटले हे जलदगती न्यायालयात लावून आरोपींवर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच अपेक्षा.  
 
अर्चना संदीप गादेवार : निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा झाली, हे खूपच झाले. पण, हे प्रकरण डिसेंबर २०१२ मधील असताना फाशीची शिक्षा मार्च २०२० मध्ये झाल्याचे वाईट वाटते. त्याचक्षणी ही शिक्षा झाली असतीतर काही प्रमाणात अत्याचाराच्या घटना घटण्यास मदत झाली असती. भविष्यात असे कृत्य करणाऱ्या आरोपींना त्याचक्षणी कठोर शिक्षा देण्यात यावी, असे वाटते.
 
डॉ. व्ही. एन. पुरणशेट्टीवार : आजचा दिवस ‘निर्भया दिवस’ म्हणून इतिहासात नोंद झाली. अन्याय, अत्याचार, बलात्कार पिडीत शेकडो निर्भयांना अखेर न्याय मिळाला. चार नराधमांना एकाचवेळी फाशी देऊन महिला सुरक्षा व्यवस्थेला मजबुती मिळाली.  निर्भयाच्या आई-वडिलांनी कायदेशीर लढाई जिंकल्याचा आनंद होत आहे. नराधमांनीही सुटण्यासाठी धडपड केली. पण, न्यायदेवतेला ते मान्य नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com