VIDEO : उधळपट्टी, नैसर्गिक अतिवृष्टीत पाडला कृत्रिम पाऊस, औरंगाबादमधील प्रकार

अंभई परिसरात कृत्रिम पावसासाठी घिरट्या घातल असलेले विमान.
अंभई परिसरात कृत्रिम पावसासाठी घिरट्या घातल असलेले विमान.

औरंगाबाद - मराठवाड्यात कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीला 52 दिवसांसाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राटही दिले; मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्यानंतरही मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला नाही. त्यामुळे खरिपाच्या उत्पन्नात मोठी घट झाली. आता पीक काढणी सुरू असताना जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टी होत आहे. अशातच टार्गेट पूर्ण करण्यासाठी या नैसर्गिक पावसात पुन्हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानाद्वारे क्‍लाऊड सिडिंग केले जात आहे. हा प्रकार जिल्ह्यातील अंभई (ता. सिल्लोड) मंडळात शनिवारी (ता.28) घडला. त्यामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. 

विशेष म्हणजे अंभई व परिसरात महिनाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अंभई-बोजगाव शिवारातील खेळणा नदीला तीन वेळाही पूर आला आहे. अंभईमध्ये मागील पंधरा दिवसांत नैसर्गिक अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात साचलेले पाणी बाहेर काढावे लागत आहे. छोटे-छोटे नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पाऊस कधी थांबतो याच प्रतीक्षेत या परिसरातील शेतकरी होते. दोन दिवसांपूर्वी या परिसरात पाऊस थांबला; मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे शेतकरी पीक काढणीच्या कामाला लागले. अशातच गरज नसतानाही शनिवारी या परिसरात कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या विमानाने ढगांमध्ये रसायनाची फवारणी केली. त्यामुळे पाऊस पडल्याने काढलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. 
 
गरज होती तेव्हा पाडला नाही 
मराठवाड्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये कृत्रिम पावसाची गरज होती; पण त्यावेळी कृत्रिम पावसाची प्रयोग यशस्वी झाला नाही. आता अंभई परिसरात मोठ्या प्रमाणावर ढग येत असल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडणारे विमान जिकडे ढग तिकडे जाऊन पाऊस पाडून टार्गेट पूर्ण करीत आहे. जेव्हा पाऊस पाडायचा तेव्हा पाडला नाही. आता अतिवृष्टी होत असताना पुन्हा पाऊस पाडण्याचा का घाट का घातला जात आहे. ज्या भागात पावसाची गरज आहे. तिकडे पाऊस पाडणार विमान फिरकतही नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया करमाड येथील शेतकरी नाथा कुबेर यांनी दिली. 
 

शेतकरी म्हणतात 
  
आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे. अतिपावसामुळे हातचा माल वाया गेला. आता वावर चिभडले आहे. पंधरा दिवसांपूर्वीही हेच विमानाने परिसरात घिरट्या घातल्या होत्या. तेव्हाही
मोठा पाऊस झाला होता. 
- सुनील कैलास दुतोंडे, शेतकरी, अंभई. 
 
महिनाभरापासून सुरू असलेला पाऊस दोन दिवसांपूर्वीच पाऊस थांबला. त्यामुळे दिलासा मिळाला असे वाटले. म्हणूनच आता शेतातले पाणी बाहेर काढून रब्बीची तयारी करीत होतो; पण
कृत्रिम पावसासाठी विमान घिरट्या घातल असल्याने चिंता वाढली आहे. 
- मिथुन दुतोंडे, शेतकरी, अंभई.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com