आष्टी : राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला असतानाही बँकांकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्याचा सपाटा सुरू आहे. मार्चअखेरीच्या वसुलीसाठी बँका शासन नियम पायदळी तुडवून शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अशाच प्रकारे नोटिसा मिळत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. आष्टी तालुक्यात यंदा दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे वीजबिल वसुली, शेतऱ्यांकडील सक्तीची थकबाकी वसुली यावर निर्बंध आलेले आहेत.
नियमानुसार या ठिकाणी सक्तीची कर्जवसुली करता येत नाही. परंतु आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या सरकारी बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा येत आहेत. मार्चअखेरीमुळे बँकांची आतापासूनच वसुली मोहीम सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जवसुलीसाठी नोटिसा पाठविण्याचा सपाटा बँकांनी लावला आहे.
शेतकऱ्यांना बँकांकडून नोटिसा पाठविण्याचा सपाटा सुरू असून, त्यात कृषिकर्जाचे पैसे व्याजासह न भरल्यास न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नोटिसा येत असल्याने दुष्काळ नावालाच जाहीर झाला आहे का, असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून बॅंकांनी सक्तीची कर्ज वसुली तसेच महावितरणने वीजबिल वसुली न करण्याच्या सूचना आहेत. बॅंकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली असून याबाबत वरिष्ठांना कळवून निर्णय घेण्यात येईल.
- बाळदत्त मोरे, प्रभारी तहसीलदार, आष्टी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.