लातूर : वर्ष १९९३ चा झालेला भूकंप, त्यानंतर २०१५ मध्ये रेल्वेने करावा लागलेला पाणीपुरवठा यामुळे देशपातळीवर लातूर जिल्हा चर्चेत आला. तसेच तो गुन्हेगारीच्या संदर्भात वेगवेगळ्या घटनांनी देखील चर्चेत राहिला आहे. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरण असो किंवा गेल्या आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून स्मोक कॅन्डल फोडण्याच्या घटनेने लातूर देशपातळीवर चर्चेत आले आहे.
हळूहळू लातूर संवेदनशीलतेकडे वाटचाल करीत आहे. या पार्श्वभूमीवर येथे दहशतवाद विरोध पथकाचे ‘एटीएस’ कार्यालय असणे गरजेचे झाले आहे. सध्या या विभागाचा कारभार नांदेडहून हाकला जात आहे__. एखादी घटना घडल्यानंतर तीन-साडेतीन तासांनी नांदेडचे पथक येऊन तपासणी, चौकशी करण्याचा सोपस्कार करण्याचाच प्रकार होत आहे. अशा तपासणीत काय हाती लागणार हा खरा प्रश्न आहे.
लातूर जिल्हा हा सातत्याने राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने चर्चे राहिलेला आहे. लातूरचा भूकंपाने जागतिक पातळीवर चर्चेला गेला. दुष्काळ तर लातूरच्या पाचवीलाच पुजलेला आहे. वर्ष २०१५ मध्ये तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ लातूरवर आली होती. यामुळे देखील लातूर चर्चेत आले. लातूर हा कर्नाटक व तेलंगणा या दोन राज्याच्या सीमेलगतचा जिल्हा आहे. या दोन राज्यातील अनेक गुन्हेगारांचाही लातूर जिल्ह्यात वावर राहत आहे. यासोबतच लातूरचे गुन्हेगारीचे कनेक्शनही काही घटनांतून समोर आलेले आहे.
सामाजिक सलोखा, जातीय सलोखा ही लातूर जिल्ह्याची जमेची बाजू असली तरी मागील काही घटनेने लातूर जिल्हा देश पातळीवर चर्चेत राहिला आहे. काही वर्षापूर्वी पुण्यात जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील संशयित हिमायत बेग याचे लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये वास्तव्य होते. तेथेच त्याने बॉम्ब तयार केल्याचे स्पष्ट झाले होते. आता गेल्या आठवड्यात देशाची संसद सुरक्षा भेदण्याची घटना घडली. यात चाकूर तालुक्यातील झरी येथील अमोल शिंदे हा तरुण समोर आला आहे. याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
घटना दिल्लीची असली त्याचे कनेक्शन थेट चाकूरपर्यंत येऊन पोहचले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी देश पातळीवरील तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पण पुन्हा एकदा लातूर चर्चेत आले आहे. दहशतवाद विरोध पथक (एटीएस) हे एक महत्त्वाची विंग आहे. गुन्हेगार, दहशतवाद रोखण्यासह सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काम ही विंग करते. गुप्त माहिती काढून संबंधितांवर कारवाईही केली जाते.
मात्र लातूर जिल्ह्याला एटीएसचे कार्यालयच नाही. एखादी घटना घडल्यानंतर नांदेडहून येथे पथक पाठवले जाते. काही वर्षापूर्वी नळेगाव येथे बसमध्ये झालेला स्फोट असो, किंवा येथे काही महिन्यापूर्वी फुगेवाल्याच्या सिलेंडरचा स्फोट असो, त्यात आता संसदेची सुरक्षा भेदण्याचा प्रकार असो सर्वात उशिरा येणारे पथक म्हणूनच एटीएसकडे पाहिले जात आहे. घटना कळल्यानंतर तीन ते साडेतीन तासांनी हे पथक येथे हजेरी लावत आहे. असे उशिरा आल्यानंतर तपास कसा लागणार हाच खरा प्रश्न आहे. सध्या तर केवळ घटनास्थळाला भेट देण्याचेच सोपस्कार होताना दिसत आहेत. घटना घडून गेल्यानंतर येण्यापेक्षा अशा घटनांवर वॉच ठेवण्यासाठी या पथकाची येथे गरज आहे. त्यामुळे येथे एटीएस कार्यालय होणे गरजेचे झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.