तुमच्याकडे समस्या, आमच्याकडे समाधान!

तुमच्याकडे समस्या, आमच्याकडे समाधान!

औरंगाबाद - बंगळुरू औद्योगिक शहर झाले आणि त्याच्या समस्याही वाढीस लागल्या. महागडे; पण साचेबद्ध मनुष्यबळ, नफ्यात सातत्याने होणारी घट आदी अडचणी बंगळुरूत उद्योगांना सतावत आहेत. हीच बाब हेरून औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी अर्थात ‘ऑरिक’ने तेथील उद्योगांशी संवाद साधला आणि ‘ऑरिक’मध्ये गुंतवणूक म्हणजेच तुमच्या सगळ्या अडचणींना उत्तर आहे, असे सांगत औरंगाबादेत येण्याची साद घातली. 

महाराष्ट्रात साकारण्यात येत असलेल्या ‘नेक्‍स्ट जनरेशन’ औद्योगिक शहराची माहिती देण्यासाठी ‘ऑरिक’च्या माध्यमातून बंगळुरूत नुकताच ‘रोड शो’ झाला. यावेळी ‘ऑरिक’तर्फे तेथील उद्योगांशी संवाद साधण्यात आला. बंगळुरू उत्पादन आणि आयटी जगतातील महत्त्वाचे शहर म्हणून कार्य करते आहे. मात्र त्यांना सतावणाऱ्या अडचणी औरंगाबादेत सोडवल्या जाऊ शकतात. औरंगाबादेत रुपाला येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या गुंवणुकीचे फायदे समजावून सांगताना बंगळुरूच्या औद्योगिक जगताचे समाधान कसे होईल, या मुद्यावर भर देण्यात आला. तेथे उद्योगांमध्ये असलेल्या प्रचंड संधीमुळे माणसे कंपन्यांमध्ये टिकण्याचे प्रमाण कमी आहे. जो माणूस काम करतो तो एका साचेबद्ध चौकटीत असल्याने नव्या कल्पनांना फारसा वाव मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या दांडग्या पगाराच्या तुलनेत मिळणारा नफा वाढत नाही, अशा अनेक समस्या बंगळुरूत आहेत. त्यांचे निरसन औरंगाबादेत गुंतवणूक केल्यास होऊ शकते. या मुद्यावर ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’, ‘एमआयडीसी’ आणि ‘सीआयआय’च्या चमूने बंगळुरूतील उद्योगांना साद घातली. 

विविध कंपन्यांचा सहभाग माध्यमातून झालेल्या या ‘रोड शो’मध्ये बंगळुरूतील अनेक क्षेत्रांतील कंपन्यांनी हजेरी लावली. ‘इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन’ म्हणून प्रोजेक्‍ट करण्यात आलेल्या शेंद्रा आणि बिडकीनमधील या औद्योगिक शहरांची माहिती जाणून घेण्यासाठी आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन क्षेत्र, इलेक्‍ट्रॉनिक आदी क्षेत्रांतील कंपन्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यातील एका विख्यात देशी आयटी कंपनीशी ऑरिक व्यवस्थापनाची ‘वन टू वन’ चर्चाही झाली. 

उलाढाल, निर्यातीबाबत विश्‍वास
औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या आतापर्यंत ५२ भूखंडांच्या माध्यमातून पाच लाख चौरसमीटरपेक्षा अधिक जमीन उद्योगांसाठी वितरित करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या पॅकेजच्या माध्यमातून येथे आतापर्यंत साधारण आठ हजार कोटींची कामे सुरू करण्यात आली आहेत. टिकाऊ आर्थिक बांधणी, दर्जेदार राहणीला येथे प्राधान्य राहणार आहे. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर येथील एकूण वार्षिक उलाढाल ४६.२ बिलियन डॉलर्स, तर निर्यात ही ११.२ बिलियन डॉलर्सपर्यंत जाणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com