पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट

पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट

औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वर्षभरामध्ये मोठी घट झाली. त्याची झळ हॉटेलिंग व्यावसायिकांना बसली असून, सुविधांचा अभाव, नोटाबंदी आणि जीएसटीचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांसह बंगाली व गुजराती पर्यटकांचाही समावेश आहे. 

बिबी-का-मकबरा, पाणचक्‍की, अजिंठा, वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक औरंगाबादेत येतात; मात्र सुविधांच्या अभावामुळे विदेशी पर्यटकांची संख्या चांगलीच रोडावली आहे. 
याशिवाय नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशी पर्यटकांनीही हात आखडता घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी दिवसाकाठी एका हॉटेलमध्ये जवळपास पाच ते सात; तर महिन्याला एकूण ५० ते ७० विदेशी पर्यटक थांबायचे. सहा महिन्यांपासून ही संख्या महिन्याकाठी पाच ते सातवर आली आहे. आठवडा, दोन आठवड्यांतून एखादे दोन विदेशी पर्यटक येत असल्याचे हॉटेलचालकांनी सांगितले. हीच स्थिती थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थोड्याफार फरकाने आहे.

जीएसटीचा परिणाम
हॉटेलिंग व्यवसायात १२, १८ व २८ टक्‍के जीएसटी लावण्यात आलेला आहे. यासह वाहतुकीसह इतर खर्चातही जीएसटीमुळे वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशी पर्यटकांवर झाला आहे. पायाभूत सुविधांमुळे विदेशी पर्यटक औरंगाबादपेक्षा इतर ठिकाणाला पसंती देत आहेत.

नवरात्रोत्सव झाल्यानंतर बंगाली; तर दिवाळीनंतर गुजराती व्यक्ती पर्यटनासाठी देशभर जातात. यात औरंगाबादला येणाऱ्या पर्यटकांचीही संख्याही लक्षणीय असते; पण यंदा बंगाली आणि गुजराती दोन्ही राज्यांतील पर्यटकांनी औरंगाबादकडे पाठ फिरविली आहे.
- शिवाजी मनगटे, अध्यक्ष, हॉटेलिंग असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com