औरंगाबाद - समाजसुधारणेचा भक्कम पाया घालणारे धोरणी राजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे बारा खंड चरित्र साधने आणि प्रकाशन समितीने तयार केले आहेत. बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 16 फेब्रुवारीला या खंडांचे प्रकाशन होईल.
महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव, संपादक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या प्रकल्पाबाबत माहिती दिली. 2016 मध्ये राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अवघ्या दीड वर्षात हे काम उभे राहिले.
सध्या साडेसहा हजार पृष्ठांचे 12 खंड प्रकाशनासाठी सज्ज करण्यात आले असून, या वर्षी एकूण 25 खंड प्रकाशित होतील. दोन वर्षांत त्यांची संख्या 50 पर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, बडोद्याच्या राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड यांच्या हस्ते 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या खंडांचे प्रकाशन होईल.
|