औरंगाबाद - चारपैकी दोन उमेदवारी अर्जांत त्रुटीयुक्त बनाव आढळून आल्याने, तसेच अर्ज वेळेत न भरल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे यांनी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द केली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान शुक्रवारी हा निर्णय त्यांनी दिला.
याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंट्याल व मतदार विजय श्यामलाल चौधरी यांनी डिसेंबर 2014 मध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते, की खोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाच्या विहित वेळेत म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत न भरता 27 सप्टेंबर 2014 या शेवटच्या दुपारी तीन वाजून 55 मिनिटांनी भरला. या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या "एबी' अर्जाला नमुना 26 चे मूळ शपथपत्र जोडण्याऐवजी छायाप्रत जोडण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा मुथा यांनी हा अर्ज स्वीकारला. तसेच सदर चारपैकी अवलंबित्व म्हणून उमेदवार, पती-पत्नी, मुले अशा तीन व्यक्तींची माहिती भरावी लागते, ती भरली नाही. गोरंट्याल यांनी त्याच दिवशी यावर आक्षेप नोंदविला; परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याउलट तो रकाना काढून टाकला होता. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने खोतकर यांची आमदारकी संपुष्टात आणण्याचा आदेश दिला.
सर्वोच्च न्यायालयात अपील
या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी स्थगिती देण्याची विनंती खोतकर यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करत खंडपीठाने या प्रकरणाला 30 दिवसांची स्थगिती दिली.
|