औरंगाबाद - परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक पदोन्नतीला नकार देत आहेत. पदोन्नतीनंतर दर्जा कमी होतो आणि भरारी पथकाची ड्यूटीही बंद होते. त्यामुळेच परिवहन निरीक्षक प्रत्येक वर्षी पदोन्नती नको, असे लिहून देत आहेत. परिणामी, राज्यात सहायक परिवहन अधिकाऱ्यांच्या तीस टक्के जागा रिक्त आहेत.
राज्यातील कुठल्याही सरकारी खात्यामध्ये पदोन्नतीसाठी अगदी लॉबिंग केले जाते. पदोन्नतीसाठी एकीकडे आटापिटा असताना परिवहन विभागात मात्र उलट चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यभरातील तब्बल ऐंशी टक्के मोटार वाहन निरीक्षकांनी वयोश्रेष्ठतेनुसार मिळणाऱ्या पदोन्नतीला चक्क नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
परिवहन विभागात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) यांना वर्ग "ब' दर्जा दिलेला आहे, तर त्यांचे कनिष्ठ अधिकारी असलेले मोटार वाहन निरीक्षकांना मात्र वर्ग "अ' दर्जा दिलेला आहे. कनिष्ठ अधिकाऱ्याला वरिष्ठ दर्जा असल्याने परिवहन निरीक्षक पदोन्नती घेण्यास चक्क नकार देत आहेत. वर्ष 2008 मध्ये परिवहन विभागातील अधिकाऱ्यांकडून झालेली चूक सुधारली जात नसल्याने ही उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीने परिवहन विभागात राज्यभरातील शंभरपैकी तीस जागा रिक्त आहेत. त्यापैकी तीन पदे सरळसेवा भरतीची, तर एकूण 27 पदे ही मोटार वाहन निरीक्षकांनी पदोन्नती नाकारल्याने रिक्त आहेत.
|