Aurangabad 45 km main pipeline work in Delay process
Aurangabad 45 km main pipeline work in Delay processsakal

औरंगाबाद : मुख्य पाइपलाइन कामात विलंब

मुख्य पाइपलाइनच्या कामावर अवघे सहा कर्मचारी व एक पोकलेन अशी यंत्रणा

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात औरंगाबाद शहराच्या पाणीटंचाईचा आढावा घेऊन नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कंत्राटदाराने महापालिका प्रशासकांना दोन वर्षांत योजनेचे काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिली. पण प्रत्यक्षात मुख्य पाइपलाइनच्या कामावर अवघे सहा कर्मचारी व एक पोकलेन अशी यंत्रणा काम करीत आहे. सोमवार ते शनिवार अशा सहा दिवसात फक्त २० मीटरचे खोदकाम झाले आहे. त्यामुळे ४५ किलोमीटर पाइपलाइनचे काम होण्यास किती दिवस लागणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन जूनला आढावा घेत शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी व नव्या योजनेचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना केल्या होत्या. त्यानंतर योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी बैठक घेतली. यावेळी कंपनीने आगामी दोन वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिली.

दरम्यान सोमवारपासून पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर यशवंतनगर येथून मुख्य पाइपलाइनच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पण ही केवळ धूळफेक असल्याचे समोर आले आहे. शनिवारी पत्रकारांनी ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तिथे पाहणी केली असता, केवळ सहा कामगार व एक पोकलेन एवढीच यंत्रणा आढळून आली. मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम पुणे येथील जे. जे. कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत काम सुरू असले तरी सहा दिवसात फक्त २० मीटरचे खोदकाम झाले आहे. खोदकाम व नंतर माती काढण्याचे काम एकाच पोकलेनच्या माध्यमातून सुरू आहे. प्रत्येकवेळी फावडे बदलण्यासाठी अर्धा तासांचा वेळ जात आहे. साइटवर केवळ पाच पाइप कंपनीने आणून टाकले आहेत. यातील एकही पाइप अंथरण्यात आलेला नाही.

...तर तब्बल २० वर्षे लागतील!

सुमारे अडीच हजार मिलिमीटर व्यासाची पैठण ते नक्षत्रवाडी अशी ४५ किलोमीटर अंतराची पाइपलाइन टाकण्यासाठी कंत्राटदाराला मोठी यंत्रणा लावावी लागणार आहे. सध्याच्या कासवगतीने काम सुरू राहिल्यास काम पूर्ण होण्यास २० वर्षे लागतील, असे तज्ञांनी सांगितले. पाइप साइटवर नेणे, खोदकाम करणे, पाइप अंथरणे, पाइपचे जॉइंट करणे, वेल्डिंगचे टेस्टिंग अशी किचकट कामे करावी लागणार असून, ती गतीने करण्याची कंत्राटदाराची इच्छाशक्ती नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. तर योजनेचे पूर्ण करण्याची निकड महापालिकेला आहे. पण या दोन्ही यंत्रणा कंत्राटदाराकडून काम करून घेण्यास अपयशी ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर शहराच्या पाणी पुरवठ्यात लक्ष घातले आहेत. पण त्यानंतरही कंत्राटदाराची धूळफेक सुरू आहे. गेल्या सहा दिवसात या कामाकडे एकही अधिकारी फिरकलेला नाही.

पाइप टाकण्याच्या कामासाठी या आठवड्यात तीन मशीन येतील. २०० मीटर पाइप टाकण्याचे काम झाल्यानंतर नेमक्या काय अडचणी येत आहेत, हे लक्षात घेतले जाईल. हायवेमुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. विजेचे खांब, झाडे तोडण्याची कामे करावी लागणार आहेत. काही दिवसात पाइपलाइन टाकण्याचे काम गतीने होईल.

-अजय सिंग, कार्यकारी अभियंता एमजीपी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com