औरंगाबाद : धुळे-सोलापूर मार्गाला केंब्रिज रस्ता जोडणार

हालचाली सुरू : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प करणार पीएमसी नियुक्त
National Highways Project
National Highways Projectsakal

औरंगाबाद : शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जालना आणि रिंग रोडने येणारी वाहने सोलापूर-धुळे बायपासमार्गावर वळविण्याचे नियोजन सुरू आहे. केंब्रिजचा रस्ता धुळे-सोलापूर या महामार्गाच्या बायपासला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाकडून पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार)ची नियुक्ती केली जाणार आहे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी रिंगरोडसह बीड बायपास महामार्ग तयार करण्यात आला. मुंबई, पुणे व इतर राज्यातून येणारी जड वाहने बीड बायपासमार्गे वळविण्यात आली. बीड आणि जालन्याला जाण्यासाठी या रस्त्यावर वाहनांची २४ तास वर्दळ झाल्याने हा रस्ता अपघातग्रस्त बनला. त्यातच या रस्त्याच्या एका बाजूला गांधेली, बाळापूर, कमळापूर, देवळाई, सातारा, ईटखेडा ही गावे आल्यामुळे या परिसरात रहिवाशांची संख्या वाढली. त्यामुळे रस्त्यावर जड वाहनांसह नागरिकांची दुचाकी, चारचाकी, रिक्षासारखी वाहनेदेखील धावू लागली.

पर्यायाने रस्त्यावर अपघात वाढले. जड वाहनांमुळे वर्षभरात २०० ते ३०० जणांचे बळी जात होते. त्यामुळे या रस्त्यावरील जड वाहतूक इतरत्र हलविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू होती. त्याच सोलापूर-धुळे या महामार्गाचा बायपास रस्ता हा ए. एस. क्लब ते निपाणी फाटा असा तयार करण्यास मंजुरी मिळाली. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने अवघ्या तीन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण केले. सोलापूर-धुळे महामार्गाचा बायपास तयार होताच या रस्त्यावरुन जड वाहनांची वाहतूक वळविण्यात आल्यामुळे शहरासह बीडबाय महामार्गावरील वाहतुकीचा त्रास बराचसा कमी झाला.

जड वाहने या मार्गावरुनच धावत असली तरी जालना आणि जळगावमार्गे येणाऱ्या जड वाहनांना बीड बायपास आणि शहरातूनच जावे लागते. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभागाकडून विचारविनिमय केला जात आहे. सोलापूर-धुळे महामार्गाच्या बायपासवर ही वाहतूक वळविण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. केंब्रिज येथून बीडबायपासला जोडणारा रस्ता पुढे सोलापूर-धुळे बायपासला जोडण्यासाठी एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत जमीन संपादित करावी लागणार आहे.

सहा ते आठ महिन्यांचा लागू शकतो कालावधी

या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक अनिकेत कुलकर्णी म्हणाले की, केंब्रिज रस्ता हा सोलापूर-धुळे बायपासला जोडण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प यांच्याकडून लवकरच पीएमसीची नियुक्ती केली जाईल. पीएमसीकडून डीपीआर तयार करण्यात येईल. यासाठी साधारणपणे सहा ते आठ महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com