Aurangabad: साखर विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना रोखलं

sugarcane factory
sugarcane factory

औरंगाबाद: मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कुलूप लावण्यावर ठाम असलेल्या बीड जिल्ह्यातील जवळपास 50 उस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी क्रांती चौकापासून जोरदार घोषणाबाजी करत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयावर धडक दिली. मोठ्या प्रमाणात असलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्‌वारापासून काही अंतरावरच या शेतकऱ्यांना रोखण्यात आले. तेथेही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत प्रचंड घोषणा दिल्या.

बीड जिल्ह्यातील उस उत्पादकांच्या प्रश्‌नावर 29 डिसेंबर 2020 ला प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयात आयोजित बैठकीला बीड जिल्ह्यातील चार कारखान्यांचे कुणीही आले नव्हते. एका कारखान्याचे कार्यकारी संचालक तर दोन कारखान्यांचे प्रतिनिधी हजर झाले. अधिकाऱ्यांनी निक्षूण सांगूनही कारखाने ऐकत नसल्याचा निषेध करत शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गंगाभीषण थावरे व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर)कार्यालयातून बाहेर पडणे पसंत केले होते.

सोबतच मागण्यांविषयी निर्णय घ्या अन्यथा 1 जानेवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा काढून प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा निर्धार व्यक्‍त केला होता. कार्यालयाने निक्षूण सांगूनही कारखाने ऐकत नसतील बैठकीला येत नसतील तर याला काय म्हणावे, असा प्रश्‌न उपस्थित करत श्री थावरे यांनी त्यावेळी प्रश्‌नांची सरबत्ती अधिकाऱ्यांवर केली होती. शुक्रवारी ठरल्यानुसार गंगाभीषण थावरे पाटील यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील शेतकरी प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयावर धडकले.

कार्यालयाला आधीच पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शेतकऱ्यांना कार्यालयाला कुलूप लावता आले नाही. शेतकऱ्यांची मागण्याविषयी घोषणाबाजी सुरू असतांनाच कार्यालयाच्या बाहेर येत प्रादेशीक सहसंचालक (साखर) सोनाली रावल ठाकूर व विशेष लेखापरीक्षक, वर्ग1, सहकारी संस्था (साखर) बीडचे रशीद शेख यांनी श्री थावरे व आंदोलक उस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना त्यांच्या मागण्यांविषयी 5 जानेवारीला बैठक आयोजीत करण्यात आल्याचे, तसे बीड जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना कळविल्याचे व या बैठकीत सहभागी होण्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मागण्या मान्य होत नसल्याने कुलुप लावू आंदोलन करण्यासाठी आम्ही आलो होतो. शिवाय दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबाही दर्शवायचा होता असे श्रीा थावरे म्हणाले. आता 5 तारखेला आयोजीत बैठकीला कारखाने प्रतिसाद देतात का, उस उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मागण्या कोणत्या आहेत?
- गेटकिनचा परजिल्ह्यातून येणारा उस बंद करावा.
-पश्चिम महाराष्‌ट्रातील कारखान्यांप्रमाणे उसाला भाव देण्यात यावा.
-265 जातीच्या उस लागवडीची साखर कारखान्यांनी नोंद घ्यावी.
-उस कारखान्यांकडे दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत बील अदा करण्यात यावे.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com