
औरंगाबाद : बिबट्याच्या हल्ल्यात नऊ बकऱ्या ठार
पिशोर : येथील दिगर भागातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या नऊ बकऱ्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
बाजीराव देवराव देवकर यांच्या गट क्रमांक १४६ मध्ये गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या सोमवारी रात्री ठार केल्या तर लक्ष्मण साळुबा मोकासे यांच्या गट क्रमांक १४० मध्ये गोठ्यात बांधलेल्या चार बकऱ्या बिबट्याने ठार केल्या. वनपरीमंडळ अधिकारी सुभाष नागरे, वनरक्षक अमोल वाघमारे वनमजूर रायभान जाधव यांनी पंचनामा केला.
मागील दोन महिन्यात या परिसरात पाळीव प्राण्यांवर झालेला हा आठवा हल्ला आहे. यापूर्वी मार्च महिन्याच्या शेवटी व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गट क्रमांक १५५ व १५८ मध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू व कालवड ठार केले होते. मागील दोन महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास सोळा बकऱ्या, एक बकरीचे पिल्लू, म्हशीचे वगारू, एक वासरू, एक कालवड ठार झाले आहे. वासराचा बचाव करणारी एक गाय यात जखमी झालेली आहे. पिशोर परिसरातील हस्ता, खातखेडा, हनुमाननगर, मोहंद्री, तपोवन या परिसरात बिबट्या व बिबट्याच्या मादीचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.