Aurangabad : महापालिका निवडणुकीचे वाजणार बिगुल!

प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
Aurangabad muncipal
Aurangabad muncipalesakal

औरंगाबाद : अडीच-तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होण्याची पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांची संख्या व रचना निश्‍चित करून प्रारुप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा हे आदेश प्राप्त झाले आहेत.

महापालिकेच्या तत्कालीन नगरसेवकांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपला आहे. मात्र सुरवातीला सर्वोच्च न्यायालयातील याचिका व नंतर कोरोना संसर्गामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या. कोरोना संसर्ग संपल्यानंतरही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान महापालिकेच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन वॉर्डाचा एक प्रभाग तयार करण्याचा निर्णय घेत प्रक्रिया राबविली होती. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या प्रक्रियेला स्थगिती दिली होती.

त्यामुळे निवडणुकीसंबंधी अनिश्‍चितता होती. असे असतानाच मंगळवारी रात्री उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे आदेश काढून लगतच्या जनगणनेच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या, रचना निश्‍चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्‍यक ती कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार हे निश्‍चित झाले आहे.

ऑगस्टमध्ये दिली होती शासनाने स्थगिती

महाविकास आघाडी सरकारने तीन वॉर्डाचा एक प्रभाग तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने १२६ वॉर्ड आणि ४२ प्रभाग तयार केले. ५ ऑगस्टला आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आयुक्तांना दिले. मात्र विद्यमान राज्य शासनाने २०१७ मधील जुन्या प्रभाग रचनेप्रमाणे महापालिकेच्या निवडणूका घेण्याचा निर्णय घेत आरक्षण सोडतीला ४ ऑगस्टला स्थगिती दिली होती.

मार्च महिन्यात होऊ शकतात निवडणुका

प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा दोन ते तीन आठवड्यात तयार होऊन निवडणूक आयोगाकडे सादर होऊ शकतो. त्यानंतर आयोगाकडून तो प्रसिद्ध करुन त्यावर सूचना हरकती मागविल्या जातील. या सूचना हरकती नोंदविण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत दिली जाईल. त्यानंतर सूचना हरकतीवर जनसुनावणी होईल. नंतर प्रभागांची आरक्षण सोडत आणि मतदारयाद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम राबविला जाईल. हा कालावधी लक्षात घेता महापालिका निवडणुकीचा बार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात उडू शकेल, असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com