Aurangabad : तासाभरात मोहीम फत्ते!

‘कोम्बिंग’मध्ये पीएफआय’चे १४ ताब्यात चौघांना हर्सूल कारागृहात केले स्थानबद्ध
Police
Police sakal

औरंगाबाद : गुप्तचर विभाग (आयबी) आणि शहर पोलिस दलाच्या संबंधित पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कोम्बिंग ऑपरेशन राबवत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि ‘एसडीपीआयच्या १४ सक्रिय कार्यकर्त्यांना उचलले होते. यापैकी चार जणांना सीआरपीसी कलम १५१ (३) नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चौघांना १० दिवस म्हणजेच ६ ऑक्टोंबरपर्यंत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे न्यायालयाने मंगळवारी (ता.२७) दिले. दरम्यान, आधी औरंगाबाद एटीएसने पाच जणांना अटक केली होती. त्यांना सत्र न्यायालयाने दोन ऑक्टोंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.

संबंधित अधिकाऱ्यांनी अटकेतील आरोपींची चौकशी करून पीएफआय आणि एसडीपीआय संघटनेत कार्यरत सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची यादी बनविली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने राज्यभर त्यांची धरपकड मोहीम राबविली. महाराष्ट्रात औरंगाबादेतून सर्वांधिक १४ जणांना उचलले होते. त्यांना जिन्सी ठाण्याचे निरीक्षक राजेश मयेकर, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे यांच्यासह पोलिसांच्या विशेष पथकाच्या बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाकडून अॅड. आमेर काजी यांनी बाजू मांडली.

या निकालाचा घेतला आधार

राजेश रामराव राऊत विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणात २००३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींचा अर्ज नामंजूर केला होता. या निर्णयाचा आधार घेत चारही आरोपींना १५ दिवस स्थानबद्ध करण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे ॲड. काजी यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत चौघांना सहा ऑक्टोबरपर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

चौघांनाच का केले स्थानबद्ध?

मुनीर अहेमद सलीम अहेमद (३४, रा. मुजीब कॉलनी, रोशनगेट), शफीउल्ला खान अफरुल्ला खान (३१, रा. गल्ली नं. ६, रहेमानिया कॉलनी), मोहंमद मोहसीन मोहंमद इसाक (३४, गल्ली क्र. ३, किराडपुरा), महंमद साबेर अब्दुल खालेद (३४, रा. सी-११, संजयनगर) अशी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केलेल्या चौघांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश मयेकर यांनी दिली. विशेष म्हणजे अटकेतील वरील चार आरोपींविरोधात शांतताभंग करणे, अनधिकृत आंदोलने करणे यासह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी मुनीरविरोधात चार गुन्हे, शफीउल्ला तीन, मोहम्मद दोन आणि साबेरविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

शेजाऱ्यांना खबरही नाही!

औरंगाबाद शहरातील जवळपास दोनशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ‘पीएफआय’ आणि ‘एसडीपीआय’च्या कार्यकर्त्यांची धरपकड मोहिम फत्ते करण्यात आली. पहाटे तीनदरम्यान वरिष्ठांनी त्यांच्या हातात कारवाईसंदर्भातील माहितीचे बंद पाकिटे टेकविली अन् टास्क पूर्ण करण्याचे आदेश दिले. गुप्तचर यंत्रणेच्या आठ अधिकाऱ्यांसह पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पहाटे चारच्या आतच १४ जणांना उचलले. आजच्या ऑपरेशनदरम्यान प्रचंड कमालीची गुप्तता बाळगली होती. विशेष म्हणजे, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या शेजाऱ्यांना याची कानोकान खबरही लागली नाही.

गुप्तचरच्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी सोमवारी (ता.२६) रात्रीच्या सुमारास शहरातील तीन उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, निरीक्षक गौतम पातारे अशा मोजक्या अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक घेतली. याच बैठकीत ऑपरेशन फत्ते करण्याचा आराखडा ठरविण्यात आला होता.

दरम्यान, यापूर्वीच औरंगाबाद एटीएसने शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. जुना बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रहेमान गंज, जालना) आणि शेख नासेर शेख साबेर पाच जणांना नुकत्याच बेड्या ठोकल्या होत्या.

नाकेबंदीच्या नावाखाली बंदोबस्त

पोलिसांनी नाकेबंदीच्या नावाखाली पोलिस बंदोबस्त तैनात केला. तसेच, त्या ठाण्याच्या प्रमुखांनाही ठाण्यात उपस्थित राहून कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. पहाटे दोननंतर सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे, हरेश्वर घुगे, ज्ञानेश्वर अवघड, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, गजानन सोनटक्के यांच्यासह शहरातील मोजक्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. आवश्यक तो बंदोबस्त देत बंद पाकिटे त्यांच्या हातात दिली आणि चारच्या आत हा टास्क पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी जिन्सीतून दहा, हर्सूलमधून दोन, एमआयडीसी सिडको आणि क्रांती चौक हद्दीतून प्रत्येकी एक अशा चौदा जणांना उचलले. यावेळी शेजाऱ्यांनाही कानोकान खबर लागू दिली नाही इतक्या गुप्तपणे हे ऑपरेशन फत्ते करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

तीन महिन्यांनंतर बदलायचे घर!

शांतताभंग करणारे कार्यकर्ते हे सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. विशेष म्हणजे अशा प्रकारचे कृत्य करताना पोलिसांना आपण सापडू नये यासाठी तर अडीच तीन महिन्यांनी घर बदलतात, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले १४ जणांपैकी १० जण जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तर हर्सूल दोन, एमआयडीसी सिडको एक आणि क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीतील एक आहे. चौघांना स्थानबद्ध केल्यानंतर ऊर्वरित दहा जणांविरोधात १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com