औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना शहराच्या नवीन पाणी योजनेचे काम अतिशय मंदावल्याचे निदर्शनास आले. यामुळे निर्धारीत वेळेत पाणी योजनेचे काम पूर्ण झालेच पाहिजे, असे बजावत त्यांनी कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेश जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.
डॉ. कराड यांनी यापूर्वीच दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक घेतली जाईल असे जाहिर केले होते, त्यानुसार शनिवारी (ता. तीन ) बैठक झाली. डॉ. कराड यांनी घेतलेली ही चौथी आढावा बैठक होती.
या बैठकीला राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, कार्यकारी अभियंता गजानन रबडे, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.बी. काजी, पाणी योजनेचे काम करणारी कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरचे प्रतिनिधी निर्णय अग्रवाल, पीएमसीचे प्रतिनिधी समीर जोशी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कराड म्हणाले, की मागच्या महिन्यात आढावा बैठक घेऊन पाणी योजनेचे काम करण्यासाठी बारचार्ट ठरवून दिला होता, पण ठरवल्याप्रमाणे काम झालेले नाही असे आता लक्षात आले आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या कामाची नोंद ठेवा, गतीने काम करा असे आदेश देण्यात आले होते, पण प्रत्यक्षात कामाची गती मंदावल्याचे चित्र आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले. दररोज १२० मीटर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, प्रत्यक्षात साठ मीटर जलवाहिनीच रोज टाकली जात आहे.
जलवाहिनीचे वेल्डिंग करण्यासाठी २३ टीम होत्या, आता त्या नाहीत. जलशुध्दीकरण केंद्राचे काम देखील मंदावले आहे. दररोज शंभर क्युबिक मीटर हे काम झाले पाहीजे असे असताना केवळ सोळा क्युबिक मीटर काम केले जात आहे. किमान २५० मजूर या सर्व कामांसाठी लागतात, पण प्रत्यक्षात १४५ मजूर आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. या सर्व कारणांसाठी कंत्राटदार कंपनीला नोटीस देण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत, असे डॉ. कराड यांनी सांगितले. बैठकी दरम्यान कंपनीच्या प्रतिनिधींना समज देखील दिली आहे असा उल्लेख त्यांनी केला. एमजेपीचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड म्हणाले, की कंपनीला दर आठवड्याला नोटीस बजावली जाते. आता पुन्हा नोटीस बजावून काम गतीने करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. कंपनीला दंड देखील आकारला जाईल असे त्यांनी नमूद केले.
नवीन तंत्रज्ञानानुसार करा जॅकवेलचे काम
जॅकवेलचे काम नवीन तंत्रज्ञानानुसार करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार कंपनीने मुंबई येथील तज्ज्ञांना बोलावले आहे, रविवारी (४ डिसेंबर) तज्ज्ञ मंडळी दाखल होणार आहेत. त्यांच्या बरोबर पाहणी करुन, आवश्यक तो डीपीआर तयार करुन दहा दिवसात नवीन तंत्रज्ञानानुसार जॅकवेलचे काम सुरु करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.