
'पैसे देऊन सभेला येणाऱ्या लोकांमुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही'
औरंगाबाद : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सभेवरुन राजकीय वातावरण तापले होते. या सभेवर माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीका केली आहे. तुम्ही कितीही माणसं आणा, पाच लाखांची सभा घ्या, त्याने आम्हाला फरक पडणार नाही, अशी टीका खैरे यांनी केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) शिवसेनाचा गड असून तो भक्कम राहणार आहे, असे ते म्हणाले. आज रविवारी (ता.एक) खैरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Khaire Attacks On Raj Thackeray Sabha In Aurangabad)
जिल्ह्यातून मला फोन येत आहेत. पाचशे रुपये, चहा-नाष्टा देऊन लोकांना राज ठाकरे यांच्या सभेला बोलावण्यात येत आहे. पैसे देऊन सभेला येणाऱ्या लोकांमुळे शिवसेनेला काही फरक पडणार नसल्याचे खैर म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंची बरोबरी कोणीच करु शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या सभेला भाजप मदत करत आहे. अशा कितीही सभा घेतल्या तरी शिवसेनेला फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले.
पाच लाख लोक जरी सभेला आले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. शिवसेनेच्या गडाला धक्का देण्याची कोणातही हिंमत नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.