औरंगाबाद: कोरोना संसर्गाने मृत्यूमुखी पडलेल्यांवर दीड वर्षात महापालिकेमार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. या कामासाठी स्मशानजोग्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रशासनाला साथ दिली. मात्र त्यांचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. सुमारे दोन हजार अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या लाकडांचे अंदाजे ५० लाख रुपये थकले आहेत. त्याचबरोबर स्मशासनजोगींचे चार महिन्यांचे वेतनही थकीत आहे.
महापालिकेने मोफत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा खर्च म्हणून स्मशानजोगींना अडीच हजार रुपये दिले जातात. मात्र हे पैसे वेळेत मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून स्मशानाजोगी त्रस्त आहेत. आता कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगींनी महापालिकेत धाव घेऊन संताप व्यक्त केला. यासंदर्भात पुष्पनगरी स्मशानभूमीचे स्मशानाजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले की, मागील चार महिन्यांतील लाकडाचे पैसे आणि पगार नसल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत आलो आहे. फक्त पुष्पनगरी स्मशानभूमीत एका हजारापेक्षा अधिक लोकांचे मागील चार महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. या शिवाय मोफत अंत्यसंस्कार योजनेतून सुमारे अडीच हजार अंत्यसंस्कार झाले. त्यासाठी लागणाऱ्या लाकडाचे पैसे देखील थकीत आहेत.
स्वयंसेवी संस्थांनी केली मदत
गतवर्षी मार्च ते यंदाच्या जूनपर्यंत शहरात दोन हजारपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. अनेकांचे नातेवाईक फिरकलेही नाहीत. त्यामुळे महापालिकेने नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्था आणि स्मशानभूमीतील स्मशानजोगी यांनी अंत्यसंस्कार केले. शहरातील ४० स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार झाले. मात्र प्रामुख्याने मुकुंदवाडी, पुष्पनगरी, सेंट्रल नाका येथील वैकुंठधाम, प्रतापनगर, बेगमपुरा, आंबेडकरनगर आणि कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या शिवाय पाच दफनभूमीतही अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.