लातूर : संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा व मुंबईतून पराभूत करण्याचे पाप काँग्रेसने केले होते. डॉ. आंबेडकर लोकसभेत जाऊ नयेत, हीच काँग्रेसची इच्छा होती. आज हेच काँग्रेसवाले भारतीय जनता पक्ष राज्यघटना बदलणार, अशी भाषा करीत आहेत. पण, खऱ्या अर्थाने राज्यघटनेची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली आहे. कोणाचा बापही राज्यघटना बदलू शकत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केले. येथे गुरुवारी झालेल्या जनआशीर्वाद सभेत ते बोलत होते.
काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबांना अधिक गरीब केले. काँग्रेसच्या काळात देशात ३६ मोठे घोटाळे झाले. मोदींच्या कार्यकाळात एकही घोटाळा झालेला नाही. मोदींच्या नेतृत्वात चंद्रावर तिरंगा फडकावण्याचे काम झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना काश्मीरमध्येही लागू व्हावे, असे काँग्रेसला कधीच वाटले नाही. पण, मोदी यांनी ३७० कलमाची कीड हटवून हे काम केले. राज्यघटना अधिक मजबूत करण्याचे काम मोदी करीत आहेत. काँग्रेस मात्र अपप्रचार करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.
लातूरचा पाणीप्रश्न व केंद्रीय विद्यापीठाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहीणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, बाबासाहेब पाटील, अभिमन्यू पवार, रमेश कराड, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आदींसह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.