आगीत दोन घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक, आठ लाखांचे नुकसान | Aurangabad Fire Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Fire Accident News

आगीत दोन घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक, आठ लाखांचे नुकसान

पळशी (जि.औरंगाबाद ) : पळशी (ता.सिल्लोड) येथील भर दुपारी घराला आग लागल्याने दोन घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील पळशी येथे घडली. दरम्यान चार दिवसांत आग लागून साहित्य जळण्याची ही तिसरी घटना आहे. या घटनांचा तलाठी यांनी पंचनामा केला असून या आगीच्या घटनांमध्ये (Fire Accident) जवळपास ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  शुक्रवारी दुपारी गावातील विमलबाई कुंभकर्ण यांच्या घराला आग लागली. दुपारी वेळ असल्याने आग झपाट्याने वाढली व घरातून धुर निघत असल्याने हा प्रकार निदर्शानास आला. तातडीने ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. (Fire Set To Two Houses, Many Items Burned In Sillod Taluka Of Aurangabad)

तासाभरानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत मात्र विमलबाई कुंभकर्ण यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते, तर शेजारील नंदु शिरपुरे यांच्या घरातील कटलरीचे साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत दोन्ही बहिण-भावाचे जवळपास ४ लाखांचे नुकसान झाले आहे, तर शेजारील गजानन बडक यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. आग लागलेली असताना तरुणांनी जीव धोक्यात घालून घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. सिलिंडर घरातच राहिले असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. (Aurangabad)

चार दिवसांपूर्वी भीमराव काकडे यांचे शेतातील घराला आग लागल्याने जवळपास १ लाखाचे नुकसान झाले, तर गुरुवारी अफसर बेग शेतात गव्हाचा काडीकचरा जाळत असताना आगीने रौद्ररुप धारण केले. यात त्यांचा चाऱ्याची कुट्टी, जनावरांचा गोठा व ट्रॅक्टर जळून खाक झाले. यात त्यांचे ३ लाखांचे नुकसान झाले. या तिन्ही घटनेचा तलाठी येनेगुरे यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान या आगीतील विमलबाई कुंभकर्ण व भीमराव काकडे यांना ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येकी ५ हजार अशी १० हजारांची रोख मदत देण्यात येणार आहे.

टॅग्स :SillodAurangabad News