औरंगाबाद : शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पूर्णवेळ शाळा सुरू होणार असून शिक्षक, कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकरी एम. के. देशमुख यांनी सांगितले.
शहरातील आठवी ते बारावीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये चार ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यानुषंगाने शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. शिक्षण विभागाने शहर व जिल्ह्यातील खासगी, अनुदानित, अंशतः अनुदानित अशा सर्व माध्यमांच्या शाळांकडून विविध माहिती मागविली आहे. त्यात शाळेतील एकूण शिक्षक संख्या, दररोज उपस्थित शिक्षक, पहिला व दुसरा डोस घेतलेल्या शिक्षकांची संख्या, डोस न घेतलेल्या किती शिक्षक, कर्मचारी आहेत, आरटीपीसीआर किती शिक्षकांनी केली, कोरोना पॉझिटिव्ह शिक्षक किती, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती, अशी माहिती मागविली आहे. ज्या शाळा चार ऑक्टोबरला सुरू करण्यात येणार नाहीत, त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शाळा बंदचे कारण द्यावे लागेल. शहरात आठवी ते बारावी एकूण ३६५ शाळा, महाविद्यालये असून सुमारे चार हजार शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळेत एक लाख ३६ हजार ४१५ विद्यार्थी शिक्षण घेतात.
उपस्थितीची टक्केवारी बंद
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी ५० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये केवळ तीन शाळा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, चार ऑक्टोबरपासून पूर्णवेळ शाळा सुरू होणार असून शंभर टक्के शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. शाळा, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे आदी बंधनकारक असेल. एकदिवस आड किंवा विद्यार्थी संख्येनुसार वेळेचे नियोजन करावे. कुणी आजारी असेल; तर त्यांची माहिती शिक्षण विभागास देत आरोग्य तापसणी करून घ्यावी, अशा सूचनाही दिल्याचे शिक्षणाधिकारी देशमुख म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.