नांदेड : हिवाळ्यात गार हवेच्या लाटा आल्यावर सर्दी, खोकला, तापाचीही साथ येते. यात लोकांना सर्वाधिक त्रस्त करतो तो कोरडा खोकला. पंधरा-पंधरा दिवसानंतरही ताप, खोकल्याचा त्रास कमी होत नाही. सद्यस्थितीत प्रत्येक दहा रुग्णांमागे पाच ते सहा रुग्ण कोरड्या खोकल्याने त्रस्त आहेत. वाढत्या प्रदूषणामुळेही कोरड्या खोकल्याची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
उन्हाळ्यात तीव्र सूर्यकिरणांमुळे रोगजंतू तग धरू शकत नाहीत. हिवाळ्यात मात्र तेच रोगजंतू हवेतील ओलावा आणि गारव्याने तग धरून राहतात. त्यामुळे ही साथ येत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. सध्या रस्त्यावरील विक्रेते, दुचाकीस्वार, वीटभट्टीवरील कामगार, साखर कारखान्यातील कामगारांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण प्रदूषणाचा थेट परिणाम हा आरोग्यावर होत असल्याचे डॉ. अनिल मडके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
अशी घ्यावी काळजी
दिवसभर सोसेल तेवढे गरम पाणी प्यावे
थंड पाणी व पदार्थ कटाक्षाने टाळावेत
अंगावर उबदार कपडे घालावेत
थंडी असेल तेव्हा चेहरा, घसा, छाती झाकली जाईल व शरीरात ऊब राहील याची दक्षता घ्यावी
रात्री झोपताना अंगाला श्वसनमार्गाला वारा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
दुचाकीवरून जाताना मफरल किंवा हेल्मेट वापरावे
शेकोटींपासून शक्यतो दूरच राहावे. जेणेकरून थेट धूर शरीरात जाणार नाही.
हिवाळ्यात कोरड्या खोकल्यासह सर्दी, तापाचीही साथ येत असते. त्यामुळे घाबरून न जाता दिवसातून चार वेळा सकाळ-सायंकाळ कोमट पाण्यात हळद-मीठ टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात. सर्दी, खोकला आणि ताप आल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.
- डॉ. अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, नांदेड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.