घरी अठराविश्वे दारिद्र्य, बाहेर अडथळ्यांची शर्यत. अशा परिस्थितीत जे करणार ते सन्मानाने, याच जिद्दीने आयुष्याच्या प्रवासाला बळ मिळाले. धुणी-भांडी करण्यापेक्षा वेगळे काही करावे म्हणून खडतर वाटणाऱ्या रिक्षाचे हँडल हातात घेणाऱ्या मराठवाड्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक अनिता राजू कटकुरी-पारपेल्ली यांचा.
- अनिल जमधडे
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे. शहरात अनिता राजू कटकुरी-पारपेल्ली या वीस वर्षांपासून रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवित आहेत. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या अनिता कटकुरी यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून आव्हानात्मक आणि वेगळे क्षेत्र असलेल्या रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात पाऊल ठेवले.
कुटुंबाची साथ होती म्हणूनच हे शक्य होते. पूर्वी त्या धुणी-भांडी करायच्या, मात्र त्यापेक्षा काहीतरी सन्मानाने वेगळे केले पाहिजे असे वाटत होते. म्हणूनच आरटीओ कार्यालयातून परवाना काढून रिक्षाचे स्टेअरींग हातात घेतले.
आता शहरात रिक्षा चालवताना अजिबात भीती वाटत नाही, विशेष म्हणजे प्रत्येक थांब्यावर त्यांना रिक्षा चालक बांधव सन्मानाची वागणूक देतात आणि मदतही करतात. महिला असल्यामुळे उलट रांगेतून मला अगोदर संधी देतात, असे अनिता यांनी सांगितले.
दुचाकी किंवा कार चालवणाऱ्या अनेक महिला शहरात आहेत, त्याचप्रमाणे रिक्षा चालवणारी मीही एक महिला आहे. रिक्षा चालवताना प्रवाशांकडूनही कुठला भेदभाव झाल्याचे मला जाणवत नाही, उलट प्रवासी कुतुहलाने विचारपूस करतात आणि कौतुकही करतात. हीच कौतुकाची थाप नेहमीच मला प्रेरणादायी ठरते, असे अनिता कटकुरी सांगतात.
सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी महिलांनी रिक्षा चालविण्याच्या क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकावे, अशी माझी इच्छा आहे. या क्षेत्रात महिलांनी यावे यासाठी मी अनेक महिलांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. काही धुणीभांडी करणाऱ्या महिलांना रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने दोघीजणी रिक्षा शिकत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच रिक्षाचालक वाईट आहेत, असे नाही. रिक्षाच्या व्यवसायामध्ये सध्या प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. खुल्या परमिट धोरणामुळे रिक्षाचा व्यवसाय मिळणे अवघड झाले. शहरात ३५ हजार रिक्षा चालत असल्याने प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांची मारामार सुरू झालेली आहे. शहरात प्रवाशांना मीटरनुसार भाडे देण्याची गरज वाटत नाही.
त्यामुळेच मिळेल तसे भाडे स्वीकारावे लागते. आता पती राहिले नाही, दोन मुलांना शिकवण्याची जिद्द आहे. एक मुलगा महाविद्यालयात तर दुसरा दहावीला आहे. दोघे त्यांच्या पायावर उभे रहावेत ही अपेक्षा आहे. घर भाड्याचे आहे, त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण कसे होईल, ही विवंचना आहेच.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.