औरंगाबाद : गरीब पक्षकारांची वृत्ती ही वकिलांची फी बुडविण्याकडे नसते, याचा जवळून अनुभव घेतला आणि तेव्हाच ठरविलं, की कोणत्याच पक्षकारांचे प्रकरण केवळ फीस कमी आहे, म्हणून नकार द्यायचा नाही. २० वर्षांच्या वकिलीत विविध प्रकरणांत लोकांना न्याय मिळवून देताना आलेले अनुभव ॲड. माधवेश्वरी म्हसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सर्व प्रकरणांत निष्णात वकील म्हणून ओळख असलेल्या ॲड. माधवेश्वरी या औरंगाबाद खंडपीठात २० वर्षांपासून वकिली करतात. त्यांनी दिवाणी, फौजदारी, संवैधानिक, बौद्धिक संपदा, सायबर लॉच्या केसेच लढल्या आहेत. जसा चोवीस तास डॉक्टर असतो, तसेच वकील सुद्धा २४ तास वकील असतो असेही त्या म्हणतात.
या केसमुळे दृष्टिकोन बदलला
२०१२-१३ मध्ये डॉ. सुचेता पाटील आत्महत्या प्रकरणाची केस खंडपीठात चालविताना महिला म्हणून आलेल्या अनुभवाने आयुष्याला वेगळीच दिशा मिळाल्याचे ॲड. माधवेश्वरी सांगतात. लग्न झाल्यापासून होणारा छळ एका डायरीत लिहून ठेवत डॉक्टर महिलेने आत्महत्या केलल्या संबंधित प्रकरणात न्याय मिळवून देताना जो युक्तिवाद केला, तेव्हा खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. बी.चौधरी आणि न्यायमूर्ती आय. के. जैन हेही भावनाविवश झाल्याची आठवण ॲड. माधवेश्वरी सांगतात. डॉ. पाटील आत्महत्या प्रकरणात १५ ते २० साक्षीदार होते. सेशन कोर्टात संशयित सुटल्यानंतर खंडपीठात ते प्रकरण लढणे सोपे नसते; पण एक महिला म्हणून वेगळ्या पद्धतीने युक्तिवाद करत त्या प्रकरणात न्याय मिळवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
कायद्याने युक्तिवाद होतो पण...
वकील या नात्याने एखाद्या प्रकरणाचा कायद्याने तर युक्तिवाद होतोच; पण एक स्त्री म्हणून स्त्रीची बाजू मांडताना गुन्हा सिद्ध होईपर्यंतचा प्रवास वेगळेच अनुभव देणारा असतो. क्रिमिनल केसेसमध्ये तुमच्यावर गुन्हा नोंद सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्दोषच असतात असेही ॲड. माधवेश्वरी सांगतात. महिला दिनाविषयी बोलताना त्या म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला स्त्रीसारखे तुम्ही डबल शिफ्टमध्ये काम करता येत नाही, तोपर्यंत तिची तगमग समजणार नाही.
सामाजिक कार्यातही अग्रेसर
ॲड. माधवेश्वरी या वकिलीव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यांनी आसपासच्या परिसरात ५० झाडे लावून जगविली आहेत. याशिवाय सोसायटीत ग्रंथालयही सुरू केले आहे. पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स ॲकॅडमीसोबतही त्या काम करतात. त्यांच्या मातोश्री ॲड. दीपलक्ष्मी म्हसे या महाराष्ट्र आणि गोवा बार कॉन्सिलच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा आहेत. केवळ महिला वकील असलेली त्या फर्म चालवितात.
आणि वकिली करायचं ठरवलं
वडिलांचा वकिली व्यवसाय होता, दिवसभर वडील पक्षकारांच्या गराड्यात असायचे, तेव्हा आपणही असंच व्हायचं हे ठरविलं. चौथीत पहिल्यांदा वकिलाचा वेश परिधान करून एक प्रकरणाचा युक्तिवाद केला होता. तेव्हापासून वकिलीत यायचं ठरवल्याचे ॲड. माधवेश्वरी सांगतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.