बदनापूर (जि.जालना) : तालुक्यात रविवारी (ता.दोन) वादळीवारे व विजेच्या कडकडाटासह बेमोसमी पावसाने अक्षरशः थैमान माजविले. काही ठिकाणी गारपीटही झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बदनापूर शहरासह तालुक्यात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सायंकाळी वादळीवारे व विजेच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यातील काही भागात गारपिटीच्या घटना घडल्या असून यात आंबा, मोसंबी, डाळिंब अशा फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बदनापूर तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असताना अस्मानी संकटाने देखील रविवारी सायंकाळी दणका दिला.
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणातील उष्मा कमालीचा वाढला होता. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजता बेमोसमी पावसाला सुरवात झाली. प्रचंड वादळी वारे व विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह हा पाऊस बरसला. एकूणच यामुळे शहरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. तालुक्यातील नजीकपांगरी येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला आहे. तालुक्यातील भराडखेडा, सागरवाडी आदी भागात बेमोसमी पावसासह गारपिटीची घटनाही घडली. यात आंबा, मोसंबी, डाळिंब, जांभूळ, सीताफळ आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे व सागरवाडी येथील शेतकरी विशाल जारवाल यांनी दिली. दरम्यान, बदनापूर शहरासह परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह तब्बल दोन तास पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेलीत. शिवाय सखल भागात पाऊस साचला होता. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.