जायकवाडी धरणातील जलसाठा ८७ टक्क्यांवर, पाणीपातळीत वाढ

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होणे सुरू आहे. त्यामुळे नाथसागरातील पाणीसाठा रविवारी (ता.३०) सकाळी सहा वाजता ८७.९५ टक्के झाला आहे, अशी माहिती जायकवाडी धरणाचे उपविभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट व धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी दिली. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक नऊ हजार ७२३ क्युसेक झाली आहे.


जायकवाडी धरणाची पाणीपातळी फुटात १५१९.७५ असून एकूण पाणीसाठा २६४७.५९२ दशलक्ष घनमीटर आहे, तर जिवंत पाणीसाठा १९०९.४८६ आहे. धरणाचा उजवा कालवा बंदच आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात अद्याप धरण प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नसल्यामुळे हे विद्युत केंद्र बंद आहे. पाणीसाठ्यातील होत असलेल्या वाढीमुळे धरण प्रशासन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पाणीपातळीचा दैनंदिनी अहवाल लाभक्षेत्र विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी; तसेच स्थानिक प्रशासनाला दिला जात आहे.

धक्कादायक ! शाळांकडून पालकांची शुल्कासाठी अडवणूक; शिक्षण विभागाची चुप्पी 

हर्सूलपाठोपाठ सावंगी तलाव होणार ओव्हरफ्लो
औरंगाबाद - सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शहर परिसरातील नदी-नाले वाहते झाले असून, हर्सूल तलावापाठोपाठ सावंगी तलाव देखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ३५ फूट क्षमता असलेला हा तलावात ३० फूट पाणीपातळी झाल्यानंतर ओव्हरफ्लो होतो. तलावात सध्या २७ फूट एवढा पाणीसाठा असून, एखादा मोठा पाऊस होताच तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने नारेगावसह माणिकनगर, गाडेनगर, चिकलठाणा भागाला धोक्याचा इशारा दिला आहे.


जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव ऑगस्टच्या सुरवातीलाच भरला होता. त्यानंतर महापालिकेने या तलावातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरम्यान, हर्सूल सावंगी तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तलावाची उंची सुमारे ३५ फूट असून, धरण ३० फूट भरल्यास ओव्हरफ्लो होऊ शकते. सध्या तलावात येणाऱ्या पाण्याचा ओघ बऱ्यापैकी असल्याने व पावसाळी वातावरणामुळे एखादा मोठा पाऊस पडल्यास धरण ओव्हरफ्लो होऊ शकते.

त्यामुळे नारेगाव, गाडेनगर चिकलठाणा या भागाला महापालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. हे पाणी पुढे गारखेडा तलावात पोचते. नारेगावलगत माणिकनगर आणि गाडेनगर हा भाग नदीचा काठावर असल्याने या वसाहतीत पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावरील भागात नुकसान झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पांडेय, कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता अशोक पद्मे यांनी केले आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com