छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला गुरुवारपासून (ता. १८) सुरवात होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चेकपोस्ट आणि भरारी पथके सतर्क झाली आहेत. निवडणुकीच्या काळात ५० हजारांवर रोख, दारूसाठा, दागिने आणि शस्त्र बाळगल्यास कारवाई केली जाणार आहे,
तर उमेदवार अथवा त्यांच्या नातेवाइकांनी एक लाखावरील रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केल्यास त्यांनादेखील चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यात २६ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांचे वितरण सुरू होणार आहे. प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली आहे. या निवडणुकीत पैशांचा आणि दारूचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासणीसाठी जिल्ह्यात २६ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
या चेकपोस्ट आणि भरारी पथकांत राज्य उत्पादन शुल्क, महसूल, पोलिस, वन विभाग, आरटीओ आणि आयकर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पैशांचा वापर मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी केला जाऊ शकतो.
त्यामुळे निवडणुकीच्या काळात ५० हजारांवरील रकमेची वाहतूक करणे धोकादायक ठरणार आहे. ५० हजारांवर रक्कम वाहनात आढळून आल्यास तत्काळ आयकर विभागामार्फत रकमेबाबत चौकशी केली जाणार आहे. याशिवाय सोन्याचे दागिने बाळगणेदेखील डोकेदुखी ठरणार आहे.
पैसा, दागिने, मद्य यांसह अन्य आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक होत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यावर अॅपद्वारे संबंधित विभागाला तत्काळ माहिती दिली जाणार आहे. संशयितांना संबंधित विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर भरारी पथक पुन्हा त्यांच्या कामाला लागणार आहे.
निवडणूक काळात जिल्ह्यामध्ये २५० पथके तैनात करण्यात आली आहेत. यात बैठे आणि भरारी पथकांचा समावेश आहे. भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत, तर चेकपोस्ट १५ एप्रिलपासून सतर्क झाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.