मनोज जरांगे आज मुंबईला निघणार
---
समाजबांधवांना सध्या न येण्याचे आवाहन
---
सकाळ वृत्तसेवा
जालना, वडीगोद्री, ता. १४ : मुंबईतील उपोषणाला परवानगी नाकारली असली, तरी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून दोन वाहने, दोन रुग्णवाहिकांसह दहा जणांना सोबत घेऊन रवाना होणार आहेत. ‘‘ समाजबांधवांनी सध्या मुंबईत येऊ नये, योग्य वेळी मुंबईत बोलावले जाईल,’’ असे आवाहन जरांगे यांनी सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत केले.
गेल्या शनिवारी (ता.१२) अंतरवाली सराटीत समाजबांधवांच्या राज्यस्तरीय बैठकीत जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली होती व नियोजन जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी समाजबांधवांना मुंबईकडे येण्याचे आवाहन केले होते. प्रवासाच्या टप्प्यात तीन मुक्काम होणार होते व १९ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण सुरू करणार होते. मात्र, मुंबईतील उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली. परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच, असा निर्धार त्यांनी काल व्यक्त केला होता. त्यानुसार ते निवडक साथीदारांसह रवाना होणार आहेत.
जरांगे यांच्या उपोषणाचा आज सतरावा दिवस होता. वैद्यकीय उपचारांमुळे प्रकृती काही प्रमाणात ठीक होती. मात्र, पोलिसांनी मुंबईला जाण्यास परवानगी नाकारल्यानंतर आपण औषधोपचार व पाणी घेणे बंद केले आहे; परंतु, मुंबईला जाण्याचा शब्द मागे घेणार नाही. माझ्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. मात्र, सध्या समाजबांधवांना मुंबईत नेण्याचा निर्णय बदलला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाज मुंबईत येईल, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा डाव टाकून सरकारने परवानगी नाकारली आहे. आता मी एकटाच जातो. मला कोण अडवतो आणि परवानगी कशी नाकारली जाते, ते पाहू, असे आव्हान जरांगे यांनी दिले.
कोट
--
सण-उत्सवाच्या आडून सरकारने उपोषणाला परवानगी न देण्याचा डाव साधला आहे. प्रतिडाव म्हणून माझ्या मार्गातील काटे आधी दूर करण्यासाठी आता मी एकटाच जातो. आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यानंतर योग्य वेळी समाजबांधवांना मुंबईत बोलवीन. समाज संकटात सापडू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे.
- मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते
मुंबईला असे जाणार
--
- अंतरवाली सराटीतून मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला निघणार. शहागड, गेवराई, मांजरसुंबा, बीड, पाटोदा, जामखेड, श्रीगोंदा, आष्टी, दौंड, उरळी कांचन, हडपसर, खोपोली मार्गे आझाद मैदान.
- चार ठिकाणी मुक्काम ः १५ सप्टेंबर पाटोदा (जि. बीड), १६- श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर), १७- हडपसर (पुणे), १८- खोपोली (रायगड), १९ सप्टेंबर- आझाद मैदानावर उपोषण.