आता ढिगळ कुठे-कुठे लावणार ? 

आता ढिगळ कुठे-कुठे लावणार ? 


औरंगाबाद: अगोदरच मंदीमुळे कापड व्यवसाय अडचणीत होता. त्यातून कसेबसे सावरत नाही तोच लॉकडाउन झाल्याने कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. वर्षभरात लग्नसराई, भीमजयंती आणि रमजान या काळात होणारा व्यवसाय कोरोनासुराने गिळला. त्यामुळे सर्वच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता दुकाने भाडे, नोकरांचा पगार, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तुटपुंज्या पैशातून ठिगळ तरी कुठे-कुठे लावणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

कपडा व्यापाऱ्यांसाठी लग्नसराई महत्त्वाची असते. मात्र, यंदा मोजक्याच लोकांमध्ये लग्न होत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलासुद्धा बहुतांश कापड दुकानदारांचा चांगला व्यवसाय होतो. मात्र, यंदा आंबेडकर जयंती घरातच साजरी झाली. कपडा व्यावसायिकांसाठी रमजान महिना अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

वर्षात जेवढी उलाढाल होते तेवढी या एकाच महिन्यात होते. त्यामुळे व्यापारी या महिन्यात मोठ्या प्रमाणात कापड मागवत होते. मात्र, यंदा दुकाने बंद असल्याने हा व्यवसायही बुडाला. या तीन सिझनमध्ये कपड्यांची उलाढाल १०० ते १२५ कोटींपेक्षा जास्त असते. आता कापड व्यापाऱ्यांसमोर फक्त दिवाळी आहे. या सोबत बांगड्या, चप्पल बूट, ड्रायफ्रुट विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला आहे. 

खाद्य पदार्थाची उलाढाल शून्यावर 

रमजान महिन्यात खाद्यपदार्थांचीही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. खाऊ गल्ल्यांमध्ये विशेष दुकाने चालू राहतात. रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा दिली जाते. अनेक ठिकाणी तर हैदराबादेतील हलीम, हरीस विक्रेते येत होते. सर्वत्र खाद्यपदार्थ, फळांची रेलचेल असताना हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय गेला आहे.

या व्यवसायाशी निगडित असलेल्यांचा रोजगारसुद्धा गेला आहे. अनेक कुटुंबीय रमजान महिन्यात खाद्य पदार्थ विक्री करीत होते. या खाद्यपदार्थ विक्रीतून किमान सहा महिने तरी त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागेल ऐवढी रक्कम येत होती. मात्र, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णपणे गेला आहे; तसेच ज्यूस, थंड पेय विक्रेत्यांनाही याचा जबरदस्त फटका बसला. रोजे उन्हाळ्यात आल्याने ज्यूस, थंड पेय विक्रेत्यांची मोठी उलाढाल होणार होती. 

लग्नसराई, रमजान, उत्सव या महत्त्वाच्या सिझनमध्ये कपड्यांची १०० ते १२५ कोटींची उलाढाल होते. मात्र, ती यावेळी बुडाली आहे. अक्षयतृतीयेला असेच झाले. रमजानमध्ये ड्रायफ्रुटची विक्री ही २५ ते ३० कोटींच्या पुढे असते. तसेच खाद्यपदार्थ हॉटेलिंगचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. किमान सहा महिने तरी या आर्थिक फटक्यातून बाहेर निघणे अवघड आहे. 
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ 

रमजान, लग्न सराई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला माझ्याकडे सगळ्यात जास्त नवीन कपड्यांची विक्री होते. मात्र, माझे ही तीनही सिझन गेले आहे. दुकानाचे भाडे, लाइट बील आहे. माझ्याकडे तीन मुले कामाला आहेत. आता व्यवसायच नाही तर हा खर्च कुठून करायचा? परिस्थिती खूप अवघड झाली आहे. काय करावे हेच सूचत नाही. 
- शकील अहेमद, कापड स्टोअर चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com