छत्रपती संभाजीनगर : महावितरण ही सेवा देणारी कंपनी असल्याने यापुढे पारदर्शक सेवेला महत्त्व राहील. येत्या तीन दिवसात ग्राहकांना थेट तक्रारीसाठी स्वतंत्र क्रमांक दिला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीवर आपण स्वतः लक्ष ठेवणार आहोत.
त्याचप्रमाणे प्रत्येक वॉर्डात जावून ग्राहक तक्रार निवारण करणार असल्याची माहिती महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात काही दिवसांपूर्वी सातारा-देवळाई परिसरात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर या भागातील नागरिकाना तब्बल २७ तास अंधारात रहावे लागले. या भागात केवळ मेन्टनन्स झालेले नव्हते, म्हणून ही घटना घडली.
मुळात अशा प्रकारच्या घटना घडल्याच नाही पाहिजे. महावितरणकडे प्रत्येक फिडरसाठी स्वतंत्र एजन्सी आहे. ब्रेकडाऊन झाला तर त्याच्यासाठी वेगळ्या एजन्सीज आहेत. याशिवाय महावितरणचा मोठा स्टाफ आहे, त्यामुळे नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होणे आवश्यक आहे.
यासाठी या पुढे निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात जबाबदारी निश्चित केली जाईल. महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांच्या प्रत्येक फिडर निहाय टॉप १०० ग्राहकांची यादी तयार करुन, मुख्य अभियंत्यांपासून ते लाईनस्टाफपर्यंत प्रत्येकावर वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुढील आठवड्यापासून प्रत्येक वॉर्डात जावून नागरीकांच्या समस्या जाणून त्या सोडवल्या जाणार आहे. किरकोळ कारणांसाठी पुरवठा खंडीत होऊन नागरीकांना मनस्ताप होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
वीज चोरी आणि थकबाकी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा प्रस्ताव आहे. स्मार्ट मीटरचा पहिला लॉट प्राप्त झाला असून यापुढे बसवल्या जाणाऱ्या नवीन ग्राहकांना हेच स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. शहरात भूमिगत केबल टाकण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. याशिवाय सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रुफ टॉप सोलर योजना आणि पीएम-कुसुम घटक-क योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.