
औरंगाबाद : विना मास्क फिरणाऱ्या व उघड्यावर कचरा फिरणाऱ्या आणि थुंकणाऱ्या १७० जणांकडून महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाने ५२ हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल केला. बुधवारी प्रभाग क्रमांक नऊमध्ये १७० जणांना दंड लावण्यात आला. त्यांच्याकडून ५२, ३०० रुपये वसूल करण्यात आले.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर महापालिकने खरबरदारी घेत रस्त्यावर थुंकणे, विना मास्क फिकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. बुधवारी विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या एकूण ७० जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे ३५ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ४८ नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे चार हजार ८०० रुपये आणि उघड्यावर कचरा फेकणाऱ्या ५० जणांकडून १५० रुपये प्रमाणे सात हजार पाचशे रुपये असा दंड वसूल करण्यात आला. तसेच रुग्णालयातील बायो मेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकल्याप्रकरणी बायजीपुरा येथील राहत हॉस्पीटलला पाच हजार रुपयांचा दंडही महापालिकेच्या पथकाने लावला.
कोरोनाच्या पंचवीस रुग्णांवर घरीच उपचार
सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील २५ जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. गृह विलगीकरणाचे नवे आदेशही काढण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्याच्या १७ दिवसानंतर किंवा लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवसी घेतला असेल तेथून १७ दिवसानंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तीस मुक्त करण्यात येत आहे.
रुग्णसंख्या वाढताच ३३८ जण क्वारंटाइन
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा धडाका सुरू केला आहे. एकाच दिवसात ३३८ जणांना क्वॉरंटाइन केले आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी (ता.१०) दिवसभरात जिल्ह्यात १२१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. शहरात येणारे प्रवासी तसेच शहरात कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, कुटुंबीयांना क्वॉरंटाइन केले जात आहे. ही संख्या रुग्णांच्या संख्येच्या वाढीनुसार वाढत आहे.
चार दिवसांत खरेदी करा ऑक्सिमीटर, थर्मलगन
लॉकडाउनच्या चार टप्प्यांनंतर बाजारपेठा खुल्या करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील बाजारपेठा सम-विषम पद्धतीने सुरू झाल्या. मात्र, दुकानात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांना ऑक्सिमीटर व थर्मलगन ठेवणे बंधनकारक केले आहे. ही यंत्रसामग्री खरेदीसाठी १४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची दुकानांवर तपासणी करणे महापालिकेने व्यापाऱ्यांना बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्रत्येकाने थर्मलगन व ऑक्सिमीटर दुकानात ठेवावे.
थर्मलगनच्या माध्यमातून एखाद्याला ताप आहे का याची, तर ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व पल्सरेटची तपासणी होते. सुरवातीला व्यापाऱ्यांनी सम-विषमसह यंत्रसामग्रीसाठी विरोध केला होता. मात्र आता विरोध मावळत आहे. आयुक्तांनी व्यापाऱ्यांना १४ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर दुकानांची तपासणी करून नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.