औरंगाबाद: रिक्षात अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची असलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत केली. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरिक्षक राहुल भदरगे व त्यांचे सहकारी रविवारी (ता. सहा) महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) येथे नाकाबंदी ड्यूटीवर होते. त्यावेळी रिक्षाचालक (क्र. एमएच-२०-इएफ-५६६५) सय्यद समीर सय्यद जलाल (वय- २१) हे पोलिसांजवळ आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथून ११ वाजता एका प्रवाशाला बेगमपुरा येथे सोडले, मात्र त्या प्रवाशाच्या दोन बॅग रिक्षात विसरुन राहिल्याचे समीर यांनी पोलिसांना सांगितले.
त्यावेळी पोलिस माहिती घेत असतानाच ज्येष्ठ नागरिक गुरुसागरसिंग दयालसिंग सुखमणी (वय ७१) हे धावत पळत पोलिस चौकीजवळ आले. अन् आपली बॅग रिक्षात विसरली असे सांगितले. बॅगेची खात्री केल्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या बॅग त्यांच्याच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी बॅग तपासली तेव्हा बॅगेत एका पाकिटात प्रत्येकी अडीच तोळ्याच्या दोन बांगड्या आणि रोख बाराशे रुपये आढळून आले.
प्रामाणिकपणाचे कौतुक
रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाने बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. गुरुसागरसिंग हे बॅगेच्या शोधात बाबा चौकात आले, त्यावेळी ते रिक्षाचालकांकडे चौकशी करत होते. पोलिसांनाही माहिती द्यावी, म्हणून ते चौकीत गेले, त्यावेळी बॅग सुरक्षीत असल्याचे लक्षात येताच गुरुसागरसिंग यांनी पोलिस आणि प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक तर केलेच पण रिक्षचालकाला रोख बक्षिसही दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.