लक्ष्मीकांत मुळे
अर्धापूर - पिकते पण भाव नसल्याने विकत नाही. भाव असला तरही पाऊसपाण्याने पीक टिकत नाही. यालाच कंटाळून येथील व्यंकट देशमुख या अल्पभूधारक शेतकऱ्याने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली.
त्यामुळे घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाची प्रचंड ओढाताण होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व्यंकट यांचा मुलगा अभिषेक याने निटमध्ये यश मिळवले. आता त्याला लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एबीबीएससाठी प्रवेश मिळाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबात आशेची पेरणीच झाली आहे.
सततची नापिकी आणि कर्जाची चिंता यामुळे व्यंकट यांनी आत्महत्या केली. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील सर्व सदस्य नैराश्यात होते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा,
हा प्रश्न होता. पण, या प्रतिकूल परिस्थितीवर अभिषेक कधी रडत, कुढत बसला नाही. त्याने अभ्यासात सातत्य ठेवले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. पुण्यजागर प्रकल्पातून त्याला शैक्षणिक मदत मिळाली.
दहावीत तो ९२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. पुढे त्याने बारावी आणि वैद्यकीय प्रवेश पत्रता परीक्षेत चांगले यश मिळाले. त्याचीच फलश्रुती म्हणजे त्याला आता एबीबीएससाठी प्रवेश मिळाला आहे.
‘पुण्यजागर’चे सहकार्य
अभिषेकच्या आई विजयमाला देशमुख यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. त्या उच्च शिक्षित असल्याने नांदेड येथील एका इंग्रजी माध्यमातून शाळेत नोकरी सुरू केली. पण, वेतन अल्प होते.
त्यामुळे त्यांनी शिकवणी वर्ग सुरू केले. त्यातूनही फार काही मिळत नाही. पण, खर्च खर्च भागत आहे. अशातच अभिषेकच्या शिक्षणासाठी पुण्यजागर प्रकल्पाचे सहकार्य मिळाले.
माझ्या यशात आई, माझे काका मनोज आणि आमोल देशमुख यांचे खूप मोठे योगदान आहे. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या शैक्षणिक वाटचालीत पुण्यजागर प्रकल्पाचे खूप मोठे सहकार्य लाभले आहे.
- अभिषेक देशमुख