फुलंब्रीत रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूक ठप्पच..!

महात्मा फुले चौकात कायमच वाहनांचा गराडा
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

फुलंब्री : फुलंबी शहरांतून छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने दररोज हजर वाहनांची महामार्गावर वर्दळ असते. परिणामी खुलताबाद महामार्गावर जाण्या - येण्यासाठी हाच रस्ता असल्याने रस्ता रुंदीकरण करूनही वाहतूक ठप्पच होत असल्याचा प्रकार फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकात दिसून येत आहे. महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी व वेरूळ लेणी या दोन्ही लेण्यांचा केंद्रबिंदू फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौक असल्याने याच महामार्गावरून दोन्ही लेण्यांना देशी - विदेशी हजारो पर्यटक जात असतात. मात्र सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फुलंब्री येथील बस स्थानक ते महात्मा फुले चौक या रस्त्यावर मोठी चारचाकी व दुचाकी वाहने उभी राहत असते.

महात्मा फुले चौकात रस्त्यावर फळांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या रहातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तर फुलंब्री शहरात जातांना भाजीपाला व्यावसायिकही याच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. वाहतूक कोंडीची समस्या मागील गेल्या चार-पाच महिन्यापासून वाढली असून सातत्याने होणारी वाहतूक कोंडी शहरवासीयांसाठीही डोकेदुखी ठरू लागले आहे.

महात्मा फुले चौकाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या हातगाड्या काढण्यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याला पत्र व्यवहार केलेला आहे. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कारवाई करावी त्यासाठी पोलिसांचा त्यांना बंदोबस्त दिला जाईल.

- रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक फुलंब्री.

महात्मा फुले चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. मात्र सदरील हद्द राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस प्रशासनाला सदरील वाहतूक कोंडी संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे.

- ऋषिकेश भालेराव, प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपंचायत फुलंब्री.

• चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी •

फुलंब्री पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ शहरात वाहतूक ठप्प झाल्यानंतर शहरातून बाहेर पडायला लागत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे कसरतीचे बनले आहे. मागील गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती महात्मा फुले चौकात करण्यात यावी, अशी मागणी आता वाहनधारकासह फुलंब्री शहर वासियांतून होऊ लागली आहे.

• छोटे व्यावसायिक रस्त्यावर •

छोटे मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय थाटून महामार्गाच्या कडेला बसलेले असल्याने या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. तसेच या महामार्गावर वाहने हे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांची वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

• वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सिग्नलची आवश्यक •

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग महात्मा फुले चौक परिसरातून जात असल्याने दररोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या महामार्गावरून जाताना सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. महात्मा फुले चौकाच्या परिसरात सिग्नल लावल्यास होणाऱ्या वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसू शकतो.

• रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडी कायम •

फुलंब्री शहरातून जाणारा छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणही करण्यात आलेले आहे. मात्र रुंदीकरण करीत असताना काही भागात रस्ता अरुंदच राहिला आहे. तर काही ठिकाणी रुंदीकरण झाले. त्या ठिकाणी फळांच्या हातगाड्यासह इतर वाहने एकाच जागेवर तासन्तास उभे राहत असल्याने रस्ता रुंदीकरण होऊनही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com